करंजा- रेवस खाडीत शेकडो टन माल वाहून नेणारे यारा शिपिंग कॉर्पोरेशन या कंपनीचे पृथ्वीराज या कार्गो जहाजाला अपघात होऊन ते खाडीत बुडाली होते. त्यामुळे जहाजावरील शेकडो टन चुनखडी समुद्रात पसरली. माशांच्या प्रजनन काळात चुनखडीच्या या समुद्र प्रदूषणामुळे माशांची बीजे नष्ट झाल्याने आता रेवस ते करंजा खाडीतील मासे गायब झाले आहेत. त्यामुळे ५०० पेक्षा जास्त पारंपारिक मच्छिमारांवर आज उपासमारीची आली आहे.
यारा शिपिंग कॉर्पोरेशनचे पृथ्वीराज हे जहाज करंजा- रेवस खाडींमधून धरमतर बंदराकडे जात होते. त्यावेळी चुनखडी लादलेल्या या जहाजाचा अपघात होऊन त्याला करंजा-रेवस खाडीत जलसमाधी मिळाली. ही घटना 3 जुलै 2019 रोजी सकाळी नऊ वाजता सुमारास घडली. या जहाजात १६२ टन चुनखडी होती. ही चुनखडी समुद्रात पसरली. त्यामुळे समुद्रातील खारे पाणी आणि चुनखडी यात रासायनिक प्रक्रिया होऊन खाडीत मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण झाले. ही घटना मत्स्य प्रजनन काळात घडली. माशांची बिजे नष्ट झाली. त्यामुळे आता रेवस ते करंजा खाडीतील मासे पूर्णपणे गायब झाले आहेत.
मासेच मिळेनासे झाल्यामुळे ५०० पेक्षा जास्त पारंपारिक मच्छिमारांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. तसेच त्यांच्या आता उदर निर्वाहाचा प्रश्नसुद्धा ऐरणीवर आला आहे. दिशादर्शक यंत्र नसल्यामुळे जहाजाला अपघात झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ही घटना झाली तेव्हापासून महाराष्ट्र्र मेरीटाईम बोर्ड, मुंबईकडे अनेकदा दिशादर्शक यंत्र लावण्याची आणि मच्छिमारांना नुकसान भरपाईची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
मच्छिमाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान
पृथ्वीराज या जहाजाच्या अपघातानंतर अनेक खासगी कंपनीच्या जहाजांनी भीती पोटी आपला मार्ग बदलला आहे. ते आता खाडीतील पारंपारिक मच्छिमारांच्या चॅनेलवरून आपली जहाजे घेऊन जात आहेत. त्यामुळे खाडीतील पारंपारिक मच्छिमाराचे जाळी, दार, सस यासारखे मासे पकडण्याच्या साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या घटनेला रासायनिक आणि औद्योगिक कंपन्यांचा निष्काळपणा आणि सागरी महामंडळाच्या उदासिनता कारणीभूत असल्याचा आरोप स्थानिक मच्छिमारांनी केला आहे. मच्छिमारांनी मस्यव्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची भेट घेऊन नुकसान भरपाईची मागणी केली होती. मात्र त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
पृथ्वीराज या जहाजातील समुद्रातील चुनखडी समुद्रात मिसळल्याने खाडीत प्रदूषण झाले आहे. त्यामुळे माशांची बिजे नष्ट झाली असून खाडीतील मासे गायब झाले आहेत. शासनाने याची दखल घेत आम्हा मच्छिमारांना नुकसान भरपाई द्यावी
-हेमंत गौरीकर, संचालक , करंजा मच्छिमार विकास सोसायटी