घरमुंबईअल्पवयीन मुलाच्या हत्याचे गूढ उकलले

अल्पवयीन मुलाच्या हत्याचे गूढ उकलले

Subscribe

--सख्ख्या चुलत भावानेच केली होती हत्या

वाडा येथील उसर गावात झालेल्या एका हत्येचा उलगडा तब्बल तीन वर्षानंतर करण्यात पोलिसांना यश आले आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादात सख्ख्या चुलत भावानेच हत्या करून शौचालयाच्या टाकीत आपल्या भावाला टाकले होते. या घटनेची दहशतवाद व नक्षलवाद विरोधी पथकाचे प्रभारी मानसिंग पाटील यांनी तब्बल तीन वर्षानंतर उकल करून आरोपीला अटक केली आहे.

सदर खुनातील आरोपी अमिनुल बेपत्ता होण्याअगोदर त्याचा कर्नाटक, केरळ, आसाम असा मोबाईलद्वारे अनेकवेळा संपर्क झाला होता. त्यामुळे तो दहशतवादाकडे वळल्याचा संशय बळावल्याने हा तपास दहशतवाद आणि नक्षलवाद विरोधी पथकाकडे देण्यात आला होता. नष्ट झालेल्या पुराव्यांचा धागा जोडत दहशतवाद व नक्षलवाद विरोधी पथकाचे प्रभारी मानसिंग पाटील यांनी हत्या करणारा मोहमद मन्सूर मोहमद अकबर अली हाच असल्याचे शोधून काढले. त्याच्या चौकशीत अमिनुलचा मृतदेह वाडा येथील उसर गावात हत्या करून शौचालयाच्या टाकीत टाकल्याचे त्याने कबूल केले.

- Advertisement -

त्याच्या कबुलीने पोलीस निरीक्षक वाडा, कार्यकारी दंडाधिकारी वाडा, वैद्यकीय अधिकारी वाडा आणि पंचा समक्ष शौचालयाच्या टाकीतून अमिनुलचा सांगाडा हस्तगत करून हत्येच गुढ उकलले आहे. यात तपास पथकाचे तीन सहायक फौजदार चंद्रकांत ढाणे, सुनील देशमुख, प्रकाश कदम यांनी महत्वाची माहिती गोळा करण्याची मोठी कामगिरी केली. तुषार माळी, संतोष निकोळे, दिनेश गायकवाड, सचिन पाटील, जगदिश गोवारी, प्रवीण वाघ, सुभाष आवाड, शुभम ठाकुर यांनी तीन पथकात विभागून वेषांतर करून अनेक महिने मागोवा घेऊन हत्या करणारा व्यक्तीला गाठण्यात यश आले आहे.

अमिनूल हक्क मोहमद मुनताज अली हा आसाम येथून आपला सख्खा चुलत भाऊ मोहमद मन्सूर मोहमद अकबर अली यांचे समवेत वाडा येथे फकरुद्दीन खानभाई चित्तलवाला यांच्या फार्म हाऊसवर कामासाठी आला होता. याच ठिकाणी किरकोळ कारणावरून दोघात वाद झाला होता. राग अनावर झाल्याने मोहमद मन्सूर याने अमिनूल हक्क याला लाकडी दंडक्याने जीवे ठार मारून अमिनूल राहत असलेल्या खोलीच्या मागच्या बाजूस असलेल्या शौचालयाच्या टाकीत टाकून स्वतः तेथून काम सोडून निघून गेला होता. अमिनूल सापडत नाही म्हणून त्याच्या मामाने तो बेपत्ता झाल्याची वाडा पोलीस ठाण्यात 28 डिसेंबर 2016 रोजी तक्रार दिली होती. त्यानंतर 363 नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेतील माहितीचा मागोवा हवालदार प्रशांत तुरकर, सायबु तडवी यांनी शिताफीने मिळवली.

- Advertisement -

काही केल्या अमिनूलचा थांगपत्ता लागत नव्हता. या दरम्यान तो दहशतवादी संस्थांकडे वळला असल्याचीही शंका व्यक्त झाल्याने तपास यंत्रणा त्या दिशेने तपास करू लागल्या होत्या. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे तपास देण्यात आला होता. अनेक महिने धावपळ केल्यानंतरही प्रयत्नांना यश आले नाही. पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांनी दहशतवाद व नक्षलवाद विरोधी पथकाचे प्रभारी मानसिंग पाटील यांना तपास करण्याचे निर्देश दिले होते. अखेर शेवटी मोठ्या प्रयत्नाने गुन्ह्याचे गूढ उकलण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -