स्मार्टससीटी योजनेअंतर्गत ठाण्यात तब्बल १ लाख ४० हजार स्मार्टमीटर बसविण्यात येत आहेत. हे स्मार्टमीटर सोसायटी आणि व्यापारी गाळे यांना बसविण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश होते. मात्र, पाणीपुरवठा अधिकारी यांनी आदेशाची पायमल्ली करीत चाळीतही मीटर लावल्याने स्मार्टमीटर योजना पुन्हा वादाच्या भोवऱ्यात आली आहे. लावलेले मीटर काढण्याची नामुष्की आता पालिका प्रशासनावर अली आहे. तर झोपडपट्टी भागातही मीटर बसून संबंधित एजन्सीचा बिले काढण्याचा डाव असल्याचा आरोप यावेळी नगरसेवकांनी सभागृहात केला. अखेर लावलेले मीटर काढण्याचे आदेश महासभेत देण्यात आले आहेत.
अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराने नगरसेवक अडचणीत
ठाणे पालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा आणि बिले वसुलीसाठी अमलात आणलेली स्मार्टमीटर योजना ठाण्यात लागू करण्यात आली. ठाण्यातील मोठी गृहसंकुले आणि व्यावसायिक गाळे यांना पहिल्या टप्प्यात स्मार्ट मीटर लावण्याचे आदेश पालिका आयुक्त असंजीव जयस्वाल यांनी दिले होते. ठाण्यातील संकुले-व्यापारी गाळे आणि चाळीत आतापर्यंत पालिका पाणीपुरवठा अधिकारी यांनी २२ हजारापेक्षा जास्त मीटर बसविले. घोडबंदर रोड आणि माजिवडा यांच्यासह शहरात चाळीत हे मीटर बसविल्याने अन्य रहिवाशी लोकप्रतिनिधी यांच्याकडे धाव घेत असून स्मार्ट मीटर हे लोकप्रतिनिधीच्या डोक्याला ताप ठरले आहेत.
अनेक झोपडपट्टी भागात बसवले स्मार्ट मीटर
सोमवारी महासभेत पाण्याच्या लक्षवेधीत जवळपास सर्वच नगरसेवकांनी आपल्या भागात काही चाळीत स्मार्ट मीटर लावल्याचा आरोप केला. शिवाय सभागृहात काम सुरु आहे, असे सांगून एकच खळबळ उडवली. यामुळे पालिका प्रशासनाचे अधिकारी हवे तिथे स्मार्टमीटर लावून पाण्याचे बिले वसुली करून महसूल वाढविण्याचे काम करीत असल्याचा आरोप करण्यात आला. महापौरांच्या मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत, दिवा, मुंब्रा, कोलशेत अशा अनेक झोपडपट्टी भागात हे स्मार्ट मीटर बसवण्यात आले असल्याची माहिती महापौर मीनाक्षी शिंदे आणि इतर नगरसेवकांनी उघड केली आहे. जर एका प्रभागात मीटर बसवण्याचे काम सुरु करण्यात आले असेल तर त्या संपूर्ण सभागृहात मीटर बसवण्यात यावे, अशी मागणी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केली .
तर सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी देखील आपल्या प्रभागात अजूनही स्मार्ट मीटर बसवण्याची विचारणा होत असल्याने नेमका हा काय प्रकार आहे?, असा प्रश्न त्यांनी सभागृहात उपस्थित केला. पहिल्या टप्यात केवळ १ लाख ४० हजार मीटर बनवण्यात येणार असून त्यानंतरच्या टप्प्यात सर्व ठिकाणी मीटर बसवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या उत्तरावर देखील नगरसेवक समाधानी न झाल्याने ज्या ठिकाणी अशाप्रकारचे झोपडपट्टी भागात मीटर बसवण्याची कामे सुरु करण्यात आली आहे ती कामे त्वरित थांबवण्यात यावी, असे आदेश पालिका आयुक्तांनी दिले असल्याची माहिती सभागृहात अर्जुन अहिरे यांनी दिले असल्याने या वादावर अखेर पडदा पडला.
हेही वाचा – ‘सगळी वाट लाऊन झाली आणि आता रुग्णालयात दाखल’