घरमुंबईमंदिर नाही, तर सरकारही नाही

मंदिर नाही, तर सरकारही नाही

Subscribe

उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा

केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार अनेक पक्षांना सोबत घेऊन बनवलेले होते. त्यामुळे तेव्हा राम मंदिर उभारण्याचा निर्णय घेणे शक्य झाले नाही, मात्र मोदी सरकारला संपूर्ण बहुमत आहे. तरीही साडेचार वर्षांत राम मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला नाही. तुम्ही हा निर्णय घेणार नाही तर कोण घेणार? सध्याच्या सरकारकडून जर राम मंदिर उभारण्यात येणार नसेल तर पुढे सरकार बनणार नाही. राम मंदिर मात्र जरुर बनेल, असा स्पष्ट इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल भाजपला दिला.

उद्धव ठाकरे यांनी सहपरिवार अयोध्येत राम जन्मभूमीला जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, अयोध्येमध्ये येण्यामागे माझा कोणताही छुपा अजेंडा नाही. देशातील हिंदुंची भावना व्यक्त करण्यासाठी मी इथे आलो आहे. मात्र, आता सरकारने हिंदुंच्या भावनांशी खेळू नये. इतके दिवस, वर्षे, पिढ्या गेल्या तरी राम मंदिर उभे राहत नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटल्याप्रमाणे मंदिर इथे होते, आहे आणि राहील याच्याशी आम्ही सहमत आहोत. मात्र, हे मंदिर दिसत का नाही? असा खडा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

- Advertisement -

श्रीराम तुरुंगात

आम्ही रामलल्लाच्या दर्शनाला गेल्यानंतर तिथे अद्भुत चैतन्य असल्याची जाणीव झाली. मात्र मी रामलल्लाच्या दर्शनासाठी मंदिरात चाललो की जेलमध्ये चाललो हे कळत नव्हते, अशी खंतही यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

हिवाळी अधिवेशनात अध्यादेश आणा

निवडणुकीआधी राम राम नंतर आराम सुरु असतो. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी भाजपने जाहीरनाम्यात राम मंदिराचे वचन दिले होते. मग गेल्या चार वर्षांत तुम्ही काय केले? या सरकारचे हिवाळी अधिवेशन शेवटचे आहे. तेव्हा या अधिवेशनात राम मंदिरासाठी अध्यादेश आणा, कायदा करा किंवा काहीही करा, मात्र मंदिर लवकरात लवकर बनवा. ट्रिपल तलाक, नोटाबंदीसाठी तुम्ही कोर्टात गेला होता का? शिवसेनेची हिंदुत्वासाठी तुम्हाला साथ आहेच. पण जर हे होणार नसेल तर जनतेसमोर जाहीर माफी मागावी, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -