लालबाग परळ भागात आज बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत पुन्हा एकदा चोरट्यांनी हात साफ केला आहे. मिरवणुकीच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात मौल्यवान साहित्य चोरी केल्याचे समजते. पैशांचे पाकीट, सोन्याच्या चैन, मंगळसूत्र आणि मोबाईल असे साहित्य चोरीला गेल्याच्या असंख्य तक्रारी काळाचौकी पोलीस ठाणे आणि लालबाग परिसरात मदतीसाठी उभारण्यात आलेल्या पोलीस नियंत्रण कक्षाकडे देण्यात आलेल्या आहेत. गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्यापासून या परिसरात चोरट्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. चोख पोलीस बंदोबस्त असूनसुद्धा आपल्या कौशल्याने चोरटे हात साफ करत आहेत. त्यामुळे त्यांच्या मुसक्या अवळताना पोलिसनासुद्धा कुठेतरी अपयश येताना दिसत आहे.
यापूर्वी झाल्या होत्या चोऱ्या
गणेशोत्सवाची सुरुवात झाल्यानंतर अवघ्या चारच दिवसात या भागात मोबाईल चोरीच्या १३५ हून अधिक तक्रारी काळाचौकी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आल्या होत्या. गेल्या १० दिवसात हा आकडा वाढत गेला होता. मात्र आज शेवटचा दिवस असल्याने गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत चोरीचा मोठा आकडा समोर आलेला आहे. अनेक तरुण आपले मोबाईल चोरीला गेल्याचे तसेच महिलांच्या चैन आणि मंगळसूत्र चोरी गेल्याच्या तक्रारी घेऊन काळाचौकी पोलीस ठाणे आणि लालबाग परिसरात असणाऱ्या पोलीस नियंत्रण कक्षात आल्याचे काळाचौकी पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
परप्रांतीय चोरट्यांच्या टोळ्या आल्याचा संशय
गेल्या १० दिवसात या चोऱ्याचं वाढते प्रमाण पाहता खास चोरी करण्यासाठी इतर राज्यातील चोरट्यांच्या टोळ्या आल्याचा संशय पोलीसंकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या वर्षी पोलिसांनी सूरतमधून आलेल्या एका टोळीच्या मुसक्या आवळल्या होत्या आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मोबाईल आणि इतर साहित्य जप्त करण्यात केले होते. यावर्षीचा आकडा पाहता परप्रांतातील चोरट्यांनी या गर्दीत फायदा उचलल्याचे बोलले जात आहे.
दरवर्षी लालबाग परळ भागात मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि या गर्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस नेहमीच प्रयत्न करत असतात. यंदाही जवळपास ५०० पेक्षा अधिक पोलीस लालबाग परिसरात आपले कर्तव्य बजावत आहेत. पण चोरी होण्याचे प्रकार थांबत नसल्यााचे दिसून येत आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची टीम कार्यरत असून लवकरच त्यांना पकडले जाईल.
– राजेंद्र चिखले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळाचौकी पोलीस स्टेशन