गेल्या आठवड्यापासून सुरू असलेला बेस्टचा संप अखेर बुधवारी मागे घेण्यात आला. मागील आठ दिवस मात्र या संपाचा फटका केवळ मुंबईकरांनाच नव्हे, तर अनेक सरकारी हॉस्पिटलांमध्ये उपचार घेणार्या रुग्णांनाही बसला. जास्तीचे पैसे घालून हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी जाण्यापेक्षा घरीच राहणे रुग्णांनी पसंत केले होते. संप मिटल्याने रुग्णांची फरफट थांबली आहे.
घरीच राहण्याचा घेतला निर्णय
सर्वसामान्यांना प्रवासासाठी बेस्टबसचा आधार आहे. भायखळा येथील जे.जे. या सरकारी हॉस्पिटलमध्ये दर दिवशी ओपीडीमध्ये किमान ३ ते साडेतीन हजार रुग्ण तपासणी येत असतात. या किंवा त्यापेक्षा जास्त संख्येने के.ई.एम., नायर, सेंट जॉर्ज, लोकमान्य टिळक, टाटा, वाडिया इत्यादी हॉस्पिटलांमध्ये रुग्ण दररोज तपासणीसाठी येत असतात. परंतु, बेस्टच्या दीर्घकालीन संपामुळे गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार हे दिवस ही रुग्णसंख्या कमालीची घटली. यावरून रुग्णांनी बेस्ट संपामुळे उपचारच न घेता घरीच राहण्याचा धक्कादायक निर्णय घेतला होता, असे स्पष्ट झाले.
गेल्या आठवड्यात बेस्टचा संप सुरू झाला. त्यामुळे पहिले तीन दिवस ओपीडीमध्ये रुग्णसंख्या तेवढीच होती जेवढी दररोज असते. पण, गुरुवारी, शुक्रवारी या दोन दिवशी किमान १० टक्क्यांनी रुग्णसंख्या घटली. त्यानंतर पुन्हा मंगळवारी ओपीडीमध्ये ३ हजारांपेक्षा जास्त रुग्ण दाखल झाले होते. त्यामुळे फक्त दोन दिवस ही संख्या कमी झाली होती. कदाचित रुग्णांनी प्रवासासाठी अन्य पर्याय निवडले असावेत. – डॉ. संजय सुरासे, अधीक्षक, जे.जे. हॉस्पिटल
जीटी हॉस्पिटलमध्ये सकाळपासूनच रुग्णांची गर्दी असते. पण, बेस्टच्या संपामुळे रुग्णांची संख्या २५ टक्के कमी झाली. दररोज ओपीडीत ३५० ते ४०० रुग्ण उपचारांसाठी येतात. परंतु, मागील पाच-सहा दिवसात ही संख्या कमी झाली. – डॉ. मुकुंद तायडे, अधीक्षक, जीटी हॉस्पिटल