वाघ आणि खवल्या मांजराच्या कातड्यांची तस्करी करणाऱ्या तिघांना कल्याणच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. सनी शिंदे, जयदीप चोगले, अनिकेत प्रसाद अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघेही रायगड जिल्ह्यातील रहिवाशी असून, पोलिसांनी त्यांच्याकडून वाघाच्या कातडीसह ९ खवले मांजर तसेच रिव्हॉल्वर असा एकूण २ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला.
बेलापूरच्या वन्यजीवन अपराध नियंत्रण शाखेने रचला सापळा
काटई-बदलापूर पाईपलाईन रोडला असलेल्या काटई नाक्यावर ३ तस्कर येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कल्याण युनीटचे सिनियर इन्स्पेक्टर संजू जॉन यांना मिळाली होती. अटक केलेल्या तिघांपैकी एकाकडे निळ्या-काळ्या रंगाच्या सॅगबॅगमध्ये वाघाचे कातडे आणि ९ खवले मांजर तसेच त्याच्या दोन साथीदारांपैकी एकाकडे एक रिव्हॉल्वर व दुसऱ्याकडे एक पिस्तूल रिव्हॉल्व्हर विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांसह बेलापूरच्या वन्यजीवन अपराध नियंत्रण शाखेने सापळा लावून या तिघांना अटक केली. यावेळी त्यांची अंगझडती धेतली असता सनी शिंदे (२०, रा. मु. पोस्ट जुई ता. पेन जिल्हा-रायगड) याच्याकडे असलेल्या बॅगमध्ये वाघाचे कातडे व ९ खवले मांजर आढळून आले. जयदीप चोगले (२१, रा. मु. पोस्ट पांडापूर कासुगाव ता. पेन जिल्हा-रायगड) याच्याकडे लोडेड रिव्हॉल्व्हर मिळून आले. तर अनिकेत प्रसाद (२२, रा. मु. पोस्ट पांडापूर कासुगाव ता. पेण, जिल्हा-रायगड) याच्याकडे एक लोडेड देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले.
आरोपींची चौकशी
तिन्ही आरोपींवर प्राणी वन्य जीवन संरक्षण कायद्याप्रमाणे, तसेच भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे कारवाई करून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सदर तिन्ही आरोपींची पोलीस कसून चौकशी करत असून सदृश्य वाघाची कातडी व खवले मांजराचे खवले कोठून व कसे आणले? त्याचप्रमाणे दोन्ही अग्निशस्त्रे कोठून मिळवली? दोन्ही अग्निशस्त्रांचा कुठे गैरवापर केला आहे का? याचा गुन्हे शाखा कसून शोध घेत असल्याचे सिनियर इन्स्पेक्टर संजू जॉन यांनी सांगितले.