पावसाने मुंबईला फारसा फटका दिला नसला तरी ठाणे, पालघर, जिल्ह्यात त्याने धुमाकूळ घातला आहे. पावसाचा सर्वात मोठा फटका मध्य रेल्वेला बसला आहे. पावसामुळे रेल्वे रूळ पाण्याखाली गेले होते. कसारा घाटात दरड कोसळली. तर शेलू-नेरळदरम्यान रेल्वेरुळाखालील खडी वाहून गेली. त्यामुळे लांबपल्याच्या शेकडो रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प करण्यात आली होती. त्यामुळे मुबईकरांपेक्षा लांबपल्याच्या प्रवाशांना सगळ्यात जास्त मनस्ताप सहन करावा लागला आहे. तसेच मध्य रेल्वेच्या लोकल गाड्या बंद असल्यामुळे उपनगरीय रेल्वे स्थानकांवर दिवसभर शुकशुकाट दिसून आला होता. पर्याय नसल्यामुळे रेल्वे प्रवाशांनी बेस्ट बस, खासगी टॅक्सी आणि रिक्षा धाव घेतली. मात्र मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील रस्तांवर पाणी साचल्याने प्रवासी अर्धात अडकून पडले होते.
शनिवारी दिवसभर मुंबईकरांना वेठीला धरणार्या पावसाने रविवारी देखील मुंबई आणि आजुबाजूच्या परिसराला झोडपणे सुरूच ठेवले. मध्यरात्रीपासूनच कोसळणार्या पावसाने कुर्ला ते सायन रेल्वे स्थांकादरम्यान रेल्वे रूळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पाऊस सतत सुरु असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव सकाळी मध्य रेल्वे मुख्य मार्ग आणि हार्बर मार्गावरील लोकलसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. तर ट्रान्स हार्बर मार्गावरी वडाळा ते अंधेरी दरम्यान रेल्वे वाहतूक सुरळीत होती. पश्चिम रेल्वे मार्गावरील वसई ते विरारदरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने विरारकडे जाणार्या गाड्या सकाळी पासून बंद होत्या. मात्र दिवसभर चर्चगेट ते बोरिवली दरम्याने लोकल सेवा सुरळीत होती. त्यामुळे पश्चि मार्गावरी प्रवाशांना काही दिलासा मिळाला आहेत.
लांबपल्याच्या शेकडो गाड्या रद्द
अतिवृष्टीमुळे कसारा घाटात दरड कोसळली होती. त्यामुळे मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक रेल्वेमार्ग पूर्णपणे ठप्प झाले होते. तसेच शेलू-नेरळदरम्यान रेल्वेरुळाखालील खडी वाहून गेली. सोबतच कर्जत ते कल्याण रेल्वे मार्गवरी सिग्नल यंत्रणा पाण्यात वाहून गेल्याने घाट विभागाची रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती. मुंबईकडे येणार्या लांबपल्याच्या एक्स्प्रेस गाड्या इगतपुरी, नाशिकला थांबविण्यात आल्या होत्या. तर शेकडो गाड्या शॉर्ट टर्मिनेट तर 100 पेक्षा अधिक मुबईकडे येणार्या आणि मुंबईतून जाणार्या गाड्या रद्द करण्यात आल्या. मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना रेल्वेकडून नास्ताची व्यवस्था करण्यात आली होती.
पावसाने घडवला रेल्वेच्या मेगा ब्लॉक
शनिवारी झालेल्या पावसामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीन तेरा वाजवले होते. त्यामुळे रविवारी प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वेने रविवारच्या मेगा ब्लॉक रद्द केला होता. मात्र कोसळणार्या पावसाने पुन्हा मध्य रेल्वेवर जम्बो ब्लॉक घडवून आणल्याचे चित्र दिसून येत होते.
सुट्टीमुळे रेल्वेवर ताण कमी
पावसामुळे दादर ते ठाण्यादरम्यान रेल्वेरुळ पाण्याखाली बुडाल्याने रविवारी सकाळी मध्य रेल्वेची लोकल सेवा बंद करण्यात आली होती. रविवारी सार्वजजिक सुट्टी असल्याने आणि पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मुंबईकरसुद्धा घराबाहेर निघाले नव्हते. सर्वांनी घरी राहणेच पसंद केले. त्यामुळे रविवारी रेल्वेवर ताण कमी होता.
महामार्गावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा.
पावसाचा मोठा फटका नाशिक-मुंबई आणि पुणे-नाशिक महामार्गावर दिसून आला. महामार्गांवर 6 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्याच सुट्टी संपवून शहरात परतणार्या मुंबईकरांचे त्यामुळे चांगलेच हाल झाले.
विमानांना दोन तासांचा विलंब
दोन दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका हवाई वाहतुकीलादेखील बसला. कमी दृश्यमानता व खराब हवामानामुळे काही विमानांची उड्डाणे दोन तास विलंबाने झाली. तर एअर इंडियाचे ९.३५ चे मुंबई-जोधपूर विमान विमानतळावरच रखडले होते. सुरक्षेमुळे अनेक विमाने रद्द करण्यात आली.
प्रवाशांची लूट
मुसळधार पावसामुळे मुंबईकडे येणार्या ५० पेक्षा जास्त मेल, एक्स्प्रेस गाड्या नाशिक रोड, इगतपुरी,आणि पुण्यापर्यंतच चालविल्या आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना मुंबईत पोहचण्यासाठी तारेवरील कसरत करावी लागत होती.त्यातच रिक्षा, टॅक्सी आणि खाजगी ट्रॅव्हल्सवालांनी आपले दर वाढवून प्रवाशांची लूट चालवली होती.
कल्याण -कर्जत दोन दिवस बंद
पावसामुळे मध्य रेल्वेच्या कर्जत ते कल्याण दरम्यान रेल्वे मार्ग दोन दिवस बंद रहाणार आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वेची सिग्नल यंत्रणा पाण्यात वाहून गेल्यामुळे आणि रेल्वे रुळावर चिखल झाल्यामुळे मध्य रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे. सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी मध्य रेल्वेला दोन दिवसांचा कालावधी लागणार आहेत. त्यामुळे कल्याण ते कर्जतची रेल्वे वाहतूक दोन दिवसांसाठी बंद असणार आहेत.
रेल्वे प्रवाशांसाठी एसटी आली धावून
मुसळधार पावसामुळे लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी एसटीकडून ३८ बसेस सोडविण्यात आल्या होत्या. त्यापैकी तीन बसेस उंबरमाळीहून पुण्याला पाठवण्यात आल्या. तर बाकी 3५ बसेस ठाणे, कल्याण करीता सोडण्यात आल्या होत्या.