अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणावर आत्तापर्यंत बॉलिवूडमधील घराणेशाही, काही मोठी नावं आणि त्यांच्यावर केले जाणारे आरोप यांचीच चर्चा होती. काही दिवसांपूर्वी सुशांतच्या वडिलांनी त्याची प्रेयसी रिया चक्रवर्तीवरच त्याला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप केल्यानंतर त्यावर चर्चा सुरू झाली. आणि आता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या (Sushant singh Rajput Suicide) प्रकरणाला एक नवंच राजकीय वळण मिळालं आहे. राज्यातल्या विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सुशांत प्रकरणात सत्तेमधल्या एका तरूण मंत्र्याचा समावेश असल्याचा खळबळजनक आरोप केल्यानंतर आता खुद्द सत्तेतल्या एका वरिष्ठ मंत्र्यानेच सवाल उपस्थित केला आहे. राज्यात परिवहन मंत्री असलेले आणि शिवसेनेचे निष्ठावंत नेते अनिल परब यांनी एक गंभीर मुद्दा उपस्थित करत पोलिसांना निष्पक्ष तपास करण्याचा सल्ला दिला आहे.
काय म्हणाले अनिल परब?
भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शुक्रवारी ट्वीटरवर एक व्हिडिओ पोस्ट करून सत्तेतल्या युवा मंत्र्यावर आरोप केल्यानंतर अनिल परब यांनी देखील ट्वीट (Tweet) करून त्याला उत्तर दिलं आहे. ‘कडक लॉकडाऊनच्या काळात सुशांतसिंहच्या घरी पार्टी कशी झाली आणि त्या पार्टीला कोण कोण उपस्थित होतं, याची देखील मुंबई पोलिसांनी चौकशी करावी. मुंबई पोलीस सक्षम असल्यामुळे तेच या प्रकरणाचा छडा लावतील. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सध्या भलतेच राजकारण होऊ लागले आहे. ज्यांच्याकडे या प्रकरणाबद्दल माहिती आहे, त्यांनी तात्काळ ती माहिती मुंबई पोलिसांना द्यावी. माझे पोलिसांना देखील आवाहन आहे की त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी’, असं अनिल परब यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. वरवर पाहाता त्यांनी मुंबई पोलिसांवर विश्वास दाखवला असला, तरी ‘निष्पक्ष चौकशी’ आणि ‘सुशांतच्या घरी लॉकडाऊनमध्ये पार्टी कशी झाली, त्याला कोण कोण उपस्थित होतं?’ असा उल्लेख करून त्यांनी आपलं खरं मत व्यक्त केल्याचं बोललं जात आहे.
सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात सध्या भलतेच राजकारण होऊ लागले आहे. ज्यांच्याकडे या प्रकारणाबद्दल माहिती आहे त्यांनी तात्काळ ती माहिती @MumbaiPolice ना द्यावी. माझे पोलिसांनादेखील आवाहन आहे की त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी.
— Anil Parab (@advanilparab) July 31, 2020
कडक लॉकडाऊन काळात सुशांतसिंगच्या घरी पार्टी कशी झाली व त्या पार्टीला कोण कोण उपस्थित होते, याचीदेखील @MumbaiPolice चौकशी करावी. मुंबई पोलिस सक्षम असल्यामुळे तेच या प्रकरणाचा छडा लावतील.@AnilDeshmukhNCP
— Anil Parab (@advanilparab) July 31, 2020
दरम्यान, अतुल भातखळकरांनी या प्रकरणात ट्वीट करून गंभीर आरोप केले होते. ‘अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासात राज्यातल्या एका युवा मंत्र्याचा दबाव असल्यामुळे मुंबई पोलीस (Mumbai Police) याची निष्पक्ष चौकशी करू शकत नाहीत. CBI ने तात्काल हा तपास हाती घेऊन बॉलिवुडमधील माफियांचा पर्दाफा करावा, अशी विनंती मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना करतो’, अशी मागणी त्यांनी केली होती.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात राज्यातील एका युवा मंत्र्याचा दबाव असल्यामुळे मुंबई पोलीस निष्पक्ष चौकशी करू शकत नाहीत.
CBI ने तात्काळ हा तपास हाती घेऊन बॉलिवूडमधील माफियांचा पर्दाफाश करावा अशी विनंती मी केंद्रीय गृहमंत्री @AmitShah यांना केली आहे. pic.twitter.com/qkwthvTfeA— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 31, 2020
अतुल भातखळकर यांच्या ट्वीटनंतर भाजपच्या इतरही नेत्यांनी शिवसेनेला या मुद्द्यावरून घेरायला सुरुवात केली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील ‘राज्य सरकार CBI कडे या प्रकरणाचा तपास सोपवायला तयार नाही तर किमान ईडी या प्रकरणात बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी दखल देऊ शकते’, असं ट्वीट केलं आहे.
There is a huge public sentiment about handing over #SushantSinghRajput case to CBI but looking at the reluctance of State Government, atleast @dir_ed ED can register an ECIR since misappropriation and money laundering angle has come out.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 31, 2020
या प्रकरणावरून दिवसागणिक वेगवेगळे खुलासे आणि ट्वीस्ट येत असताना त्याच्या तपासाकडे आता मनोरंजन विश्वासोबतच राजकीय विश्वाचं देखील लक्ष लागलं आहे. मात्र, अतुल भातखळकर यांच्या ‘युवा मंत्र्या’च्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात सत्ताधारी मंत्र्यांपैकी युवा मंत्र्यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे.