उल्ल्हासनगर येथील मेमसाब या इमारतीचा स्लॅब कोसळून ३ जण मृत्युमुखी व ५ जण जखमी झाले होते, या घटनेला ९ दिवस झाले मात्र मनपा प्रशासन आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. ३ फेब्रुवारी रोजी उल्हासनगर – ३ येथील इंदिरा भाजी मार्केट जवळ असलेल्या मेमसाब या इमारतीचा दुसऱ्या मजल्याचा स्लॅब कोसळला होता . तळमजल्यावर डॉ. ब्रिजलाल रिजवानी यांच्या आशीर्वाद क्लिनिकमध्ये उपचार घेत असलेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यावेळी दगावले होते , नितु सादीजा (७५),अनिता मौर्या (२५) व प्रिया मौर्या (२) हे मृत्युमुखी पडले होते तर इतर ५ जण जखमी झाले होते.
रहिवशांनी केला होता आरोप
मनपा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ही इमारत धोकेदायक इमारतींच्या यादीत नव्हती तर स्थानिक रहिवाशांनी आरोप केला होता इमारत धोकादायक होती मात्र प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याच्या दबावामुळे इमारतीला धोकादायक घोषित केले नव्हते. आतापर्यंत शहरात सुमारे ४ इमारती कोसळल्या असून त्यात अनेकजण ठार झाले आहेत. यावरून मनपा प्रशासनाने काही बोध घेतलेला नाही असा आरोप नागरिक करीत आहेत. नऊ दिवस झाले तरी मेमसाब ईमारत दुर्घटना प्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही.
या संदर्भात मनपाचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांना विचारले असता ते म्हणाले की,”या इमारतीमध्ये नेमके कोणत्या प्रकारचे काम सुरू होते याची आम्ही माहिती घेत आहोत, या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई होईल, पोलीस तपासात आम्ही सर्व बाबी सादर करू. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही इमारत कोसळली त्या मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डोळस यांना या संदर्भात विचारले असता ते म्हणाले की आमचा या प्रकरणी तपास सुरू आहे , लवकर आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल होईल.”