देशातील निवडणुका ईव्हीएम यंत्राच्या साहाय्याने न घेता मतपेटीद्वारे मतदान पार पाडावे अशी मागणी प्रमुख विरोधी पक्ष करत असताना आता विद्यार्थी संघटनेकडूनसुद्धा ईव्हीएम द्वारे मतदानाला विरोध होत आहे. त्यासाठी विद्यार्थी भारती या संघटनेने आजपासून ईव्हीएम विरोधी काळा सप्ताह साजरा करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार आज कल्याणच्या के .एम .अग्रवाल कॉलेज व बिर्ला कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी काळे कपडे परिधान करून मोहिमेला सुरुवात केली. या मोहिमेंतर्गत विद्यार्थी भारती ‘ईव्हीएम हटाओ, देश बचाव, बॅलेट पेपर लाओ’ चा नारा देत गावागावातील महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणार आहे.
ईव्हीएमवर विद्यार्थी भारतीचे म्हणणे
विद्यार्थी संघटनेने ईव्हीएम यंत्राद्वारे मतदाना विरोध का? याबाबत मत मांडले आहे. “२०१४ च्या लोकसभा निवडणूकीत आपल्याला मोदी लाट पहायला मिळाली. त्यावेळी विकास, राम मंदिर आणि अच्छे दिनचे आश्वासन देत मोदी यांचे सरकार सत्तेत आले. पण या पाच वर्षांचा विकास पाहता २०१९च्या लोकसभा निवडणूकीत जनता मोदी- भाजपा सरकार विरोधी होती. त्यामुळे पुन्हा हे सरकार निवडून येणे शक्य नव्हते. तरीसुद्धा पुन्हा मोदी यांचेच सरकार निवडून आले. त्यामुळे ईव्हीएम यंत्रात तसेच या व्यवस्थेत घोळ आहे, असे मत विद्यार्थी भारतीच्या राज्य अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी मांडले. “‘यह कमळ का फुल नही बनाए विकास का पुल हैं!’ सरकार जनतेचे नाही त्यास जनतेचा विकास नाही तर स्वतःचा विकास हवाय! या कमळातून सुगंध येत नाही,” असा टोला विद्यार्थी भारतीच्या राज्य कार्यवाह श्रेया निकाळजे यांनी लावला आहे. “कोणी ईव्हीएम विरोधी भूमिका घेतली की इडीचे शस्त्र तयार ठेवणार. हे सरकार आम्हा विद्यार्थ्यांच्या मागे कोणती ईडी लावणार आहे?” असा सवाल करत विद्यार्थी भारतीच्या शुभम राऊत यांनी सरकारला जवळपास आव्हानच दिले आहे.