कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पुरग्रस्तांसाठी भाजपच्या वतीने बोरिवली विधानसभा मतदारसंघात रविवारी मदतफेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे तसेच खासदार गोपाळ शेट्टी या मदतफेरीमध्ये सहभागी झाले होते. त्यांच्या समवेत बोरिवली विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. बोरिवली पश्चिम येथील स्वामी विवेकानंद पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुरग्रस्तांसाठीच्या मदतफेरीचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर बोरिवली पश्चिम येथील शनगार सर्कल, गिरगाव कट्टा, बाभई नाका (रॉयल व्हेज ट्रीट), परांजपे सर्कल, वझिरा नाका, बाभई नाका, मनुभाई ज्वेलर्स, बोरिवली स्टेशन (प्लॅटफॉर्म ३), जांभळी गल्ली नाका, बोरिवली जेल, शिंपोली सिग्नल, शिंपोली पोलीस स्टेशन, व्हेज ट्रीट १, शिंपोली एम. टी. एन. एल, मुकेश भंडारी होम (३ रस्ता), जॉग्गर्स पार्क, फिनिक्स हॉस्पिटल, वसंत कॉम्प्लेक्स सिग्नल, डी मार्ट सिग्नल, साईबाबा नगर सिग्नल, कल्याण ज्वेलर्स, मॅक्डोनाल्ड सिग्नल या मार्गे निघालेल्या मदतफेरीमध्ये विनोद तावडे, गोपाळ शेट्टी यांनी नागरिकांना पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले. भर पावसात मदत फेरी सुरुच होती. तावडे यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या आवाहनानंतर नागरिकांकडून मदतीचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरु होता. विशेष म्हणजे काही बोरिवलीकर उत्सफूर्तपणे या मदतफेरी मध्ये सहभागी झाले.
तावडेंच्या आवाहनाला नागरिकांचा प्रतिसाद
मदतफेरी दरम्यान विनोद तावडे म्हणाले की, ‘पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आज आम्ही मदतफेरी सुरू केली आहे. पूरग्रस्तांसाठी निधी संकलन करण्यासाठी ११० डबे आम्ही तयार केले आहेत. प्रत्येक डब्यात जमा होणारा संकलित निधी हा मुख्यमंत्री निधीच्या माध्यमातून पुरग्रस्तांपर्यंत पोहोचणार आहे. या मदत फेरीमध्ये जमा होणारे ब्लँकेट, बिस्कीट्स हे आम्ही सर्व मुख्यमंत्री निधिकडे पाठवणार आहोत. पुरग्रस्तांसाठी बोरिवलीकर नागरिक सढळ हस्ताने मदत करतील आणि पूपरिस्थितीमुळे जो बांधव दुःखात आहे आणि अडचणीत सापडला आहे, त्याला नक्की मदत करतील, असा विश्वास आहे.’ विनोद तावडे यांच्या आवाहनानंतर विविध दुकानदार, रिक्षाचालक, टॅक्सी चालक, फेरीवाले, विद्यार्थी, महिला, वयोवृद्ध नागरिक यांच्यासह बेस्टचालक यांनीही आपली मदत तावडे यांच्याकडे जमा केली. या मदतफेरीला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सढळ हस्ते मदत केली. विविध नागरिकांनी धान्य, बिस्किटे, पिण्याचे पाणी, विविध वस्तू, कपडे आदी स्वरूपामध्ये आपली मदत दिली.
हेही वाचा – मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाची जबाबदारी प्रवीण परदेशींकडे सोपवली