राज्यावर सध्या करोनाच्या महामारीचे संकट आहे. या महामारीच्या संकटात मुंबईतील रुग्णांना रुग्णवाहिकेसाठी ५-१५ तास मोजावे लागत आहेत. २० मार्चपर्यंत मुंबई आरटीओकडे रजिस्टर असलेल्या २९२० खाजगी अँब्युलन्स सेवा देत होत्या; पण गेल्या दोन महिन्यांपासून अचानक गायब झाल्या आहेत. मेडिकल इमर्जन्सी अंतर्गत ठाकरे सरकार खाजगी अँब्युलन्सच्या मालकांवर का कारवाई करत नाही, असा संतप्त सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान याबाबत ५ एप्रिल २०२० ला आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून कळवले होते. मात्र अद्यापही पेशंटला यासाठी झगडावे लागत आहे. दीड महिन्यांनंतरही राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने कारवाई केली नसल्याचे ते म्हणालेत.
१०८ क्रमाकांच्या सेवेवर निव्वळ ९३ रुग्णवाहिका सध्या कार्यरत आहे. देशात आणि राज्यात असलेल्या मेडिकल इमर्जन्सी अंतर्गत महापालिका आणि राज्य सरकारने बर्यापैकी त्यांचा वापर केला आहे. मग खाजगी रुग्णवाहिका मालकांवर कारवाई का नाही याबाबत स्पष्टता असायला हवी, असे देखील सोमय्या यावेळी म्हणालेत. दरम्यान याआधी किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांमध्ये मुंबईतील क्वारंटाईन सेंटर्सची कंत्राटे मिळवण्यासाठी स्पर्धा लागली असून यामध्ये कंत्राटदार मालामाल होत असल्याचा आरोप केला होता. तसेच एकीकडे करोनाग्रस्त रुग्णांचा जीव टांगणीला लागलेला असताना मात्र क्वारंटाईन सेंटर्सशी संबंधित कंत्राटांमध्ये शेकडो कोटींचा घोटाळा होत असल्याचे देखील सोमय्या म्हणाले होते.
विविध क्वारंटाईन सेंटरमध्ये कंत्राटदारांना वेगवेगळे दर आकारण्यात येत असल्याची माहिती समोर असल्याचे सोमय्या यांनी सांगत क्वारंटाईन सेंटरमध्ये रुग्णांना दोन वेळचे जेवण, चहा, नाश्त्यासाठी कंत्राट दिली असले तरी यासाठी आकारण्यात आलेले दर मात्र सारखे नसल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली होती.