तीन वर्षाच्या चिमुरडीच्या वाढदिवसाच्या तयारीसाठी हेल्मेट न घालता दुचाकी घेऊन निघालेल्या तुषार कुलकर्णी (३६) यांचा रघुकुल परिसरात अपघात होऊन दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रस्त्यात आडवा आलेल्या श्वानाला वाचविण्याच्या प्रयत्नात अपघात झाला. या अपघातात तुषार यांचा मृत्यु झाला असून कळवा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या दुःखद घटनेमुळे पारसिक नगर परिसरात शोककळा पसरली आहे. आपल्या मुलीला वाढदिवसाचा आशीर्वाद देण्यापूर्वीच काळाने तुषार यांच्यावर घाला घातला.
ठाण्यात कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पारसिक नगर येथे चंद्रभागा सोसायटीत राहणारे तुषार कुलकर्णी यांनी हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे. कुलकर्णी हे मुंबईतील कॉपर चिल्ली या हॉटेलमध्ये चांगल्या पदावर कामाला होते. बुधवारी १८ सप्टेंबर रोजी त्यांच्या मुलीचा तिसरा वाढदिवस होता. म्हणून ते घाईघाईने हेल्मेट न घालताच दुचाकी वरुन जात होते. या दरम्यान बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास रघुकुल परिसरात त्यांच्या दुचाकी समोर एक भटका श्वान आला असताना त्याला वाचविण्याच्या भावनेत त्यांच्या तोल जाऊन ते डोक्यावर पडले. यावेळी अती प्रमाणात रक्तस्त्राव झाला. रघूकुल आणि परिसरातील सर्वच तरुण मुलांनी मदत केली आणि तातडीने स्थानिक सफायर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु या अपघातात त्याचा मृत्यु झाला.
तुषार यांनी दुचाकी चालविताना हेल्मेट घातले असते तर त्यांचा जीव वाचला असता स्कुटी चालविताना हेल्मेट सक्तीनेच घाला, असा संदेश कळवा पोलिसांनी दिला आहे.