मागील पाच वर्षांत मुंबईमध्ये महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली असून बलात्काराच्या घटनांमध्ये ८३ टक्क्यांनी, तर विनयभंगाच्या घटनांमध्ये ९५ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती पुढे विधानसभेच्या प्रश्नोत्तरांमधून पुढे आली आहे. २०१३ ते २०१८ या कालावधीतले हे प्रमाण असून दंगलीच्या गुन्ह्यात ३६ टक्यांनी, तर लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या तक्रारींमध्ये १९ टक्कयांनी वाढ झाली आहे. प्रजा फाऊंडेशनने अलिकडेच हा अहवाल प्रसिद्ध केला होता. त्याच्या आधारे आ. छगन भुजबळ, आ. भारती लव्हेकर, आ. मंदा म्हात्रे, आ. जितेंद्र आव्हाड, आ. आसिफ शेख आदी आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे खुलासा मागितला.
गृहमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नावर खुलासा करताना सादर केलेल्य आकडेवारीनुसार महिलांवरील गुन्ह्याच्या तक्रारी वाढल्या असल्याचे दिसून येते. २०१३ ते १८ या कालावधीत बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत महिला अत्याचाराच्या तक्रारी पुढील प्रमाणे
गुन्हयाचा प्रकार | 2013 | 2018 |
१. बलात्कार | 394 | 889 |
२. विनयभंग | 1161 | 2583 |
३. बालकांवरील अत्याचार | ८१३ (सन १४) | 1210 |
४. दंगल | 359 | 545 |
मुंबईमधील महिलांच्या अत्याचाराची गंभीर दखल घेऊन तक्रार नोंदविण्यापासून तर पुढील न्यायालयीन प्रक्रिया अत्यंत गांभिर्याने हाताळण्यात येते, तसेच महिला अत्याचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी राज्यात 27 विशेष न्यायालये व २५ जलदगती न्यायालये स्थापन करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या खुलाशात म्हटले आहे. याशिवाय महिला सुरक्षा समित्या, विशाखा पथके यांसारख्या उपाययोजनाही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.