श्रावण महिना म्हटला की, सण-समारंभाप्रमाणे उपवासाचे दिवसही सुरू होतात. अशावेळी नेहमीची साबुदाण्याची खिचडी, उपवासाचे थालीपीठ, बटाटा – रताळ्याचे काप हे नेहमीचे पदार्थ खाऊन फार कंटाळा येतो आणि मग कधी एकदाचा श्रावण संपतो असे देखील होते. मात्र, यंदा तुम्हाला तसे मुळीच वाटणार नाही. कारण आरोग्याचं गणित सांभाळून जीभेचे चोचले पुरवणारे काही चविष्ट पदार्थ आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर पाहुया उपवासाचे ५ चविष्ट पदार्थ.
‘रताळ्याची कचोरी’
सारणाचे साहित्य
- १ वाटी चिरलेली कोथिंबीर
- १ वाटी खवलेले खोबरे
- ४-५ हिरव्या मिरच्या
- ५० ग्रॅम बेदाणा
- चिमूटभर मीठ
- चवीनुसार साखर
कचोरीच्या कव्हरसाठीचे साहित्य
- २५० ग्रॅम रताळी
- १ मोठा बटाटा
- थोडेसे मीठ
कृती
सर्वप्रथम रताळी आणि बटाटे उकडून घ्यावेत. त्यानंतर कुस्करून बारीक करावे. त्यात थोडे मीठ घालावे. अर्धा चमचा तुपावर मिरच्यांचे तुकडे परतून घ्यावेत. नंतर गॅसवरुन खाली उतरवून, त्यात १ वाटी चिरलेली कोथिंबीर, १ वाटी खवलेले खोबरे, ४–५ हिरव्या मिरच्या, ५० ग्रॅम बेदाणा, चिमूटभर मीठ आणि चवीनुसार साखर सर्व वस्तू घालून सारण तयार करावे. त्यानंतर रताळ्याची पारी करून त्यात थोडे सारण करून कचोर्या तयार कराव्यात. त्यानंतर त्या कचोऱ्या वरीच्या तांदळाच्या पिठात घोळवून तुपात तळाव्यात आणि गरमगरम खायला द्याव्यात.
‘बटाटावडा’
साहित्य
- ३ बटाटे
- शेंगदाणे तेल किंवा साजूक तूप
- १ चमचा जिरे
- १ चमचा आलं – मिरची पेस्ट
- मीठ चवीनुसार
- कोथिंबीर
- राजगिरा किंवा शिंगाडा पीठ अर्धा कप
कृती
सर्वप्रथम बटाटे उकडून कुस्करुन घ्यावेत. त्यानंतर कढईत तेल किंवा तूप घेऊन त्याला जिऱ्याची फोडणी द्यावी. त्यात आलं, मिरची पेस्ट, मीठ आणि कोथिंबीर घालून स्मॅश केलेला बटाट परतून घ्यावा. त्यानंतर राजगिरा किंवा शिंगाडा पीठ घेऊन त्यात बुडवून तळून घ्यावे. अशाप्रकारे उपवासाचे बटाटेवडे तयार.
‘साबुदाणा थालीपीठ’
साहित्य
- २ वाट्या भिजवलेला साबुदाणा
- २ उकडवलेले बटाटे
- १/२ वाटी शेंगदाणा कूट
- ६ ते ७ हिरव्या मिरच्या
- कोथिंबीर
- १ चमचा लिंबू रस
- जिरेपूड
- मीठ
- तूप
कृती
भिजवलेल्या साबुदाण्यांमधून पाणी विलग करावे. नंतर त्यामध्ये उकडलेले बटाटे कुस्करावेत आणि बारीक केलेले मिरच्यांचे तुकडे, शेंगदाण्याचा कूट, जिरेपूड, बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस, मीठ हे जिन्नस देखील त्यामध्ये घालावेत. सर्वं मिश्रण हातानेच छान एकजीव करुन घ्यावे. आता, तयार मिश्रणाचे थालीपीठ थापून घ्यावे. थालीपीठाला मध्यभागी तूप सोडण्यासाठी हलकेच भोक पाडावे. आता, नॉनस्टिक तव्यावर दोन्ही बाजूने व्यवस्थित थालीपीठ भाजून घ्यावे आणि दहीसोबत गरमागरम सर्व्ह करावेत.
‘इडली’
साहित्य
- दीड वाटी भगर
- अर्धी वाटी साबुदाणा
- एक वाटी दही
- चिमूभर मीठ आणि खाण्याचा सोडा
कृती
सर्वप्रथम भगर आणि साबुदाण वेगवेगळे भाजून घ्यावेत. त्यानंतर साबुदाणा मिक्सकरवर रवाळ बारीक करुन घेणे. मग दोन्ही साहित्य दह्यामध्ये भिजवून दोन तास तसेच भिजत ठेवणे. मग त्यात थोडा खाण्याचा सोडा आणि चवीप्रमाणे मीठ घालून नेहमीप्रमाणे इडली करणे.
घावन
साहित्य
- १ वाटी वरी तांदूळ
- १ वाटी साबुदाणे
- २ हिरव्या मिरच्या
- २ चमचे नारळाचा चव
- २ चमचे दाण्याचे कूट
- १ चमचा जिरे
- चवीपुरते मिठ
- साजूक तूप
कृती
साबुदाणा आणि वरीतांदूळ एकत्र भिजवावे. पाण्याची पातळी साबुदाणा आणि वरीतांदूळ बुडून वरती २ इंच एवढी असावी. अशाप्रकारे दोन्ही ४-५ तास भिजवावे. दोन्ही व्यवस्थित भिजल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. वाटतानाच त्यात मिरची, जिरे, खोबरे, दाण्याचा कूट, मीठ घालावे. आपण नेहमीच्या घावनाला जेवढे घट्ट भिजवतो तेवढेच घट्ट भिजवावे. म्हणजे त्या अंदाजाने मिक्सरमध्ये पाणी घालावे. नॉनस्टीक तव्याला तूप लावून घ्यावे. एक डाव मिश्रण पातळसर पसरवावे. कडेने एक चमचा तूप सोडावे. एक वाफ काढावी. एक बाजू शिजली कि दुसरी बाजू नीट होवू द्यावी. गरम गरम घावन नारळाच्या चटणी सर्व्ह करावे.