क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ का म्हटले जाते याचे ताजे उदाहरण काल दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडिअमवर झालेल्या भारत विरुद्ध अफगाणिस्तानच्या मॅचमधून पुन्हा एकदा दिसले. ही मॅच सुरुवातीपासून पाहणाऱ्या प्रत्येक चाहत्याने बांधलेले कयास अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी मोडून काढले. शेवटच्या बॉलपर्यंत मॅचची उत्सुकता ताणली गेली होती. भारताला जिंकण्यासाठी अवघा एक रन हवा असताना मोक्याच्या क्षणी रवींद्र जाडेजा रशिद खानच्या बॉलिंगवर विकेट देऊन बसला आणि अफगाणिस्तानचा आषिया कपमधील शेवटची मॅच बरोबरीत सुटली. तत्पूर्वी अफगाणिस्तानचा बॅट्समॅन मोहम्मद शेहजादने शानदात शतक केल्यामुळे त्याला सामनावीर घोषित करण्यात आले.
शेवटच्या ओव्हरपर्यंत रोमांच
या रोमहर्षक मॅचमध्ये सर्वाधिक रोमांच शेवटच्या ओव्हरला पाहायला मिळाला. भारताला जिंकण्यासाठी ६ बॉलमध्ये ७ धावा हव्या होत्या आणि अफगाणिस्तानला फक्त एक विकेट. बॉल होता आयपीएल गाजवणाऱ्या फिरकीपटू रशीद खानच्या हातात आणि स्ट्राईकवर होता २० रन्स करून सेट झालेला रवींद्र जाडेजा. पहिला बॉल जाडेजाने खेळून काढला. मात्र दुसऱ्या बॉलवर त्याने एक कडक चौकार लगावला. त्यामुळे चार बॉलमध्ये अवघ्या तीन रन्स हव्या असल्यामुळे भारताच्या आशा पल्लवीत झाल्या. त्यानंतर पुन्हा जाडेजाने एक रन काढून स्ट्राईक रोटेट केले आणि खलील अहमद स्ट्राईकवर आला.
खलील अहमदने कसाबसा एक रन काढला
४९ व्या ओव्हरमध्ये कुलदिप यादव आणि सिद्धार्थ कौल रन आऊट झाल्यामुळे नव्या दमाचा खलील अहमद काय करणार याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र त्यानेही कसाबसा एक रन काढून स्ट्राईक पुन्हा जाडेजाकडे दिले. आता दोन बॉलमध्ये जिंकण्यासाठी केवळ एक रन पाहिजे होता.
विनिंग शॉट मारण्याच्या नादात जाडेजा आऊट
३३ बॉल खेळून २५ धावा करणारा रवींद्र जाडेजा बऱ्यापैकी सेट झाला होता. ऑलराऊंडर क्रिकेटर म्हणूनही जाडेजाची ओळख आहे. त्यामुळे २ बॉलवर एक रन काढणे ही त्याच्यासाठी कठीण गोष्ट नव्हती. मात्र वर सांगितल्याप्रमाणे क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. रशीदच्या पाचव्या बॉलवर विनिंग शॉट मारण्याच्या नादात जाडेजा नजीबुल्लाहच्या हातात कॅच देऊन बसला आणि अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी मॅच जिंकल्यांचा जल्लोष व्यक्त केला.
one of the greatest moment in asia cup history, afghanistan didn't let India win #indvafg pic.twitter.com/iyWO9gfKZB
— Ali (@AleyFarooqq) September 25, 2018
सामन्याचा लेखाजोखा
अफगाणिस्तानने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. ओपनर बॅट्समन मोहम्मद शाहजादने सुरुवातील भारतीय बॉलर्सना चांगलेच धुतले. ११६ बॉलमध्ये शाहजादने १२४ धावा केल्या. तर ऑलराऊंडर मोहम्मद नबीने ५६ चेंडूत ६४ धावा ठोकल्या. इतर कोणतेही बॅट्समन चमकदार कामगिरी करु न शकल्यामुळे अफागाणिस्तानचा डाव २५२ धावांवर आटोपला. रवींद्र जाडेजाने सर्वाधिक ३ तर कुलदिप यादवने दोन विकेट्स घेतल्या.
भारताला जिंकण्यासाठी २५३ रन्सचे आव्हान होते. सलामीवीर लोकेश राहुल आणि अंबाती रायुडूने चांगली सुरुवात करून १७ ओव्हरमध्ये ११० रन्सची भागीदारी रचली. अंबाती रायुडूने ५७ तर लोकेशे राहुलने ६० धावा केल्या. त्यानंतर मधल्या फळीतील दिनेश कार्तिक वगळता एकाही खेळाडूनला चमकदार खेळ करता आला नाही. केदार जाधव आणि रवींद्र जाडेजाने भारताला विजयाच्या नजीक नेले, मात्र विजय मिळवता आला नाही.