सिडनीची खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल असून गोलंदाजांना अजिबातच मदत नाही. त्यामुळे गोलंदाजांनी संयम राखणे गरजेचे असल्याचे मत मोहम्मद सिराजने व्यक्त केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांना केवळ दोन विकेट घेता आल्या. याऊलट फलंदाजांनी चांगला खेळ केल्याने ऑस्ट्रेलियाची पहिल्या दिवसअखेर २ बाद १६६ अशी धावसंख्या होती. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लबूशेन आणि सलामीवीर विल पुकोवस्की यांनी अर्धशतके झळकावली.
खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल आहे. त्यामुळे गोलंदाज म्हणून आम्ही निर्धाव चेंडू टाकून ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होतो. खेळपट्टीकडून गोलंदाजांना अजिबातच मदत नाही. पहिल्या दोन सामन्यांत चेंडू उसळी घेत होता. मात्र, या सामन्यात चेंडूला उसळी मिळत नाहीये. परंतु, कसोटी क्रिकेटमध्ये संयम राखणे गरजेचे असते. खेळपट्टीकडून मदत नसली तरी, आम्हाला गोलंदाज म्हणून संयम राखून योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत राहावी लागणार आहे, असे सिराज पहिल्या दिवसाच्या खेळानंतर म्हणाला.
Stumps in Sydney 🏏
While India dismissed both openers, Australia look in a strong position after fifties from Will Pucovski and Marnus Labuschagne. Steve Smith remains unbeaten at the crease.#AUSvIND SCORECARD ▶ https://t.co/Zuk24dsH1t pic.twitter.com/m9XlIMwSun
— ICC (@ICC) January 7, 2021
सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवशी सिराजने १४ षटके टाकली आणि ४६ धावांच्या मोबदल्यात डेविड वॉर्नरची विकेट घेतली. भारताच्या इतर गोलंदाजांनाही फारसे यश मिळाले नाही. पुकोवस्कीला कसोटीत पदार्पण करणाऱ्या नवदीप सैनीने माघारी पाठवले. मात्र, भारताचे प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला एकही विकेट घेता आली नाही.