आशिया चषकासाठी भारतीय कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली. निवड समितीच्या या निर्णयामुळे या स्पर्धेचे प्रसारण करणारी वाहिनी नाराज झाली आहे. पण बीसीसीआयने कोणत्या खेळाडूला खेळवायचे आणि कोणत्या खेळाडूला खेळवायचे नाही हा निर्णय निवड समितीचा असल्याचे स्पष्ट केले आहे.
प्रसारण वाहिनीला उत्पन्न कमी होण्याची चिंता
आशिया चषकासाठी विराट कोहलीला विश्रांती दिल्यामुळे या स्पर्धेची प्रसारण करणारी वाहिनी नाराज झाली आणि त्यांनी आशियाई क्रिकेट परिषदेला पत्र पाठवले. ज्यात त्यांनी नमूद केले की जर कोहलीसारखा खेळाडू या स्पर्धेत खेळणार नसेल तर आमचे नुकसान (उत्पन्न कमी) होऊ शकते.
निवड समितीचा निर्णय अंतिम
एका वृत्तपत्रातील माहितीनुसार बीसीसीआयने आशियाई क्रिकेट परिषदेला याचे उत्तर दिले आहे. ज्यात त्यांच्या अधिकाऱ्याने म्हटले की भारतीय संघ निवडण्याचा अधिकार निवड समितीचा आहे. या समितीत माजी खेळाडूंचा समावेश आहे. त्यांनी या स्पर्धेसाठी उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम खेळाडूंचा संघच निवडला आहे. आशिया चषक स्पर्धेची प्रसारण करणारी वाहिनी किंवा आशियाई क्रिकेट परिषद यांना भारतीय संघात कोण असावे हे ठरवण्याचा अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी एखाद्या खेळाडूच्या निवडीसाठी दबाव टाकू नये.
सततच्या क्रिकेटमुळे कोहलीला विश्रांती
विराट कोहली मागील काही महिने सतत क्रिकेट खेळत आहे. आधी आयपीएल आणि त्यानंतर ८४ दिवसांचा इंग्लंड दौरा. त्यामुळे निवड समितीने आशिया चषकासाठी कोहलीला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेसाठी त्याच्याजागी रोहित शर्माची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेतील भारताचा सलामीचा सामना हाँग काँगविरुद्ध मंगळवारी होईल.