भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ५० धावांची खेळी केली. मात्र, त्याने अर्धशतक करण्यासाठी १७४ चेंडू घेतले. पुजाराचे हे कसोटी क्रिकेटमधील सर्वात संथ अर्धशतक ठरले. त्यामुळे पुजाराच्या फलंदाजीच्या शैलीवर ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग आणि अॅलन बॉर्डर यांनी टीका केली. ट्विटरवर एका चाहत्याने पॉन्टिंगला पुजाराच्या फलंदाजीविषयी विचारले. चाहत्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना पॉन्टिंग म्हणाला, पुजाराने योग्य पद्धतीने फलंदाजी केली नाही. त्याने फलंदाजीत अधिक आक्रमकता दाखवून धावांची गती वाढवली पाहिजे. तो संथपणे फलंदाजी करत असल्याने भारताच्या इतर फलंदाजांवर दडपण येते. याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाला होतो.
I don’t think it was the right approach, I think he needed to be a bit more proactive with his scoring rate because I felt it was putting too much pressure on his batting partners https://t.co/2OhmdATvke
— Ricky Ponting AO (@RickyPonting) January 9, 2021
पुजाराने पहिल्या डावात १७६ चेंडूत ५० धावा केल्या. त्याने या धावा केवळ २८.४१ च्या स्ट्राईक रेटने केल्या. त्यामुळे पॉन्टिंगप्रमाणेच ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार अॅलन बॉर्डर यांनीही पुजारावर टीका केली. पुजारा फटके मारायला घाबरतो. तो धावा करण्याचा विचार करत नव्हता. त्याला केवळ खेळपट्टीवर टिकून राहायचे होते. मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुजाराने अप्रतिम फलंदाजी केली होती. यंदा मात्र त्याला प्रभाव पाडता आलेला नाही. तो धावा करण्यासाठी खूप वेळ घेत आहे. तो केवळ खेळपट्टीवर टिकायचा विचार करत आहे. त्याच्या अशाप्रकारे फलंदाजी करण्याचा विपरीत परिणाम भारताच्या इतर फलंदाजांवर होत आहे, असे बॉर्डर यांनी सांगितले.