आयपीएलचा तेरावा मोसम आता शेवटच्या टप्प्यावर पोहोचला असून अंतिम सामना मंगळवारी दुबईत रंगणार आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि पहिल्यांदा ही स्पर्धा जिंकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दिल्ली कॅपिटल्समधील अंतिम सामन्यात मुंबईचे पारडे जड मानले जात आहे. मुंबई हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असून या संघाने विक्रमी चार वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. दुसरीकडे दिल्लीची अंतिम सामना खेळण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. मात्र, असे असले तरी दिल्लीचा संघ मुंबईला झुंज देईल याची दिल्लीचा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगला खात्री आहे. तसेच दिल्लीचा संघ मुंबईला पराभूतही करू शकतो असा पॉन्टिंगला विश्वास आहे.
यंदाच्या मोसमात आम्ही चांगला खेळ केला आहे. मात्र, आम्ही इतक्यात समाधानी नाही. आमचे आयपीएल स्पर्धा जिंकण्याचे लक्ष्य आहे आणि आम्ही अंतिम सामन्यात सर्वोत्तम खेळ करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. मोसमाच्या सुरुवातीला आम्ही उत्तम खेळ केला, पण त्यानंतर आमची कामगिरी खालावली. मात्र, मोक्याच्या क्षणी आम्ही तीन पैकी दोन सामने जिंकत अंतिम फेरी गाठली. आता अंतिम सामन्यात आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ करू अशी मला आशा असल्याचे पॉन्टिंग म्हणाला.
आम्ही काही सामने गमावले, पण त्याने फारसा फरक पडत नाही. प्रत्येकच संघ काही सामने जिंकला, तर काही सामने हरला. मात्र, आम्ही बरेच सामने गमावले ते लीग फेरीत. साखळी सामन्यांत एकदा पराभूत व्हायला लागल्यानंतर अचानक खेळात सुधारणा करणे अवघड होऊन जाते. मात्र, आम्ही एकूणच चांगला खेळ केला आहे. परंतु, आम्ही यापेक्षाही चांगले खेळू शकतो. आम्ही मुंबईला नक्कीच पराभूत करू शकतो, असेही पॉन्टिंगने सांगितले.