कर्णधार अजिंक्य रहाणे आणि ईशान किशन यांच्या दमदार शतकांच्या जोरावर भारत ‘क’ ने देवधर चषकाच्या अंतिम सामन्यात भारत ‘ब’ चा २९ धावांनी पराभव केला. त्यामुळे भारत ‘क’ ने देवधर चषकाचे जेतेपद पटकावले.
रहाणे आणि किशन यांनी डावाची अप्रतिम सुरुवात
या सामन्यात भारत ‘क’ ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचे सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि ईशान किशन यांनी डावाची अप्रतिम सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या विकेसाठी २१० धावांची भागीदारी केली. किशनने आक्रमक फलंदाजी करत ८७ चेंडूंत ११ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ११४ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर शुभमन गिल (२६) आणि सूर्यकुमार यादव (३९) यांनी अजिंक्यला चांगली साथ दिली. अजिंक्यने १५६ चेंडूंत नाबाद १४४ धावा केल्या. त्यामुळे भारत ‘क’ ने आपल्या ५० षटकांत ३५२ धावांचा डोंगर उभारला.
श्रेयस अय्यरच्या १४८ धावा
याचा पाठलाग करताना भारत ‘ब’ चा सलामीवीर मयांक अगरवाल १४ धावा करून बाद झाला. यानंतर ऋतुराज गायकवाड आणि कर्णधार श्रेयस अय्यरने दुसऱ्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी केली. गायकवाडला ६० धावांवर पप्पू रॉयने बाद केले. पण अय्यरने चांगली फलंदाजी सुरू ठेवत अवघ्या ११४ चेंडूंत ११ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने १४८ धावा केल्या. पण त्याला अंकुश बेन्सव्यतिरिक्त इतर फलंदाजांनी चांगली साथ न दिल्याने त्यांचा डाव ३२३ धावांवर संपुष्टात आला. भारत ‘क’ कडून पप्पू रॉयने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या.
It was a run-fest at the Kotla & India C are crowned Deodhar Trophy champions as they clinch the final by 29 runs. pic.twitter.com/ZQSOaLwOpD
— BCCI Domestic (@BCCIdomestic) October 27, 2018