ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत दुखापतींनी भारताचा पिच्छा पुरवला असून फलंदाज हनुमा विहारी चौथ्या कसोटीला मुकण्याची शक्यता आहे. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या तिसऱ्या कसोटीत विहारीने उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याने दुसऱ्या डावात १६१ चेंडू खेळून काढत नाबाद २३ धावांची खेळी केल्याने भारताने हा सामना अनिर्णित राखला. मात्र, या खेळीदरम्यान धाव घेताना विहारीच्या पायाला दुखापत झाली. या दुखापतीमुळे तो चौथ्या कसोटीत खेळू शकणार नाही हे जवळपास निश्चित आहे.
Match saved 🙌
Ashwin and Vihari batted well over a hundred deliveries each to earn India a memorable draw 👏🇮🇳
The thrill of Test cricket 😅#AUSvIND ▶️ https://t.co/jOSQoYOuSC pic.twitter.com/N8TDwKmgnZ
— ICC (@ICC) January 11, 2021
सिडनी कसोटी संपल्यावर विहारीला स्कॅनसाठी पाठवण्यात आले. ‘विहारीची दुखापत किती गंभीर आहे, हे स्कॅनचा अहवाल मिळाल्यावर कळेल. मात्र, त्याला जवळपास चार आठवडे मैदानाबाहेर रहावे लागू शकेल. त्यामुळे तो ब्रिस्बन कसोटीला मुकेलच, पण त्यानंतरच्या इंग्लंड मालिकेत खेळण्याची शक्यताही कमी आहे,’ असे बीसीसीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. इंग्लंडचा संघ लवकरच भारताच्या दौऱ्यावर येणार असून चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेला ५ फेब्रुवारीपासून सुरुवात होईल. मात्र, विहारी या मालिकेत खेळण्याची शक्यता कमी आहे. तसेच तो फिट झाला, तरी त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणे अवघड जाऊ शकेल.