भारतीय संघ यावर्षाअखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या तिन्ही संघांची सोमवारी घोषणा झाली. मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवला ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघात संधी मिळू शकेल असे म्हटले जात होते. मात्र, निवड समितीने पुन्हा एकदा सूर्यकुमारला संधी देणे टाळले. सूर्यकुमार सध्या सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याने आतापर्यंत चांगली कामगिरी करताना ११ सामन्यांत दोन अर्धशतकांच्या मदतीने २८३ धावा केल्या आहेत. त्याने या धावा १४८.९४ च्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत. त्यामुळे या चांगल्या कामगिरीनंतरही सूर्यकुमारला भारतीय संघात संधी न मिळणे, ही गोष्ट भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगला अजिबातच आवडली नाही.
वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे नियम
‘भारतीय संघात स्थान मिळण्यासाठी सूर्यकुमारने आणखी काय केले पाहिजे हेच कळत नाही. तो आयपीएल आणि रणजीच्या प्रत्येक मोसमात चांगली कामगिरी करत आहे. बहुधा वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे नियम असतात. मी भारतीय निवड समितीच्या सदस्यांना एकदा त्याच्या कामगिरीवर नजर टाकण्याची विनंती करतो,’ असे हरभजनने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले. सूर्यकुमार मागील काही वर्षे आयपीएल स्पर्धा, तसेच स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईकडून सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. त्याने मागील वर्षीच्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत ११ सामन्यांत ३९२ धावा केल्या होत्या. तो मुंबईकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.
Don’t know what else @surya_14kumar needs to do get picked in the team india.. he has been performing every ipl and Ranji season..different people different rules I guess @BCCI I request all the selectors to see his records
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) October 27, 2020