IPL चा हंगाम संपल्यानंतर आता टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेली असून सध्या ऑस्ट्रेलियन सरकारच्या नियमांनुसार १४ दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये आहे. मात्र, दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या संघानं सीरीजची जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, यादरम्यान एक वेगळा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या संघानं घेतला आहे. ऑस्ट्रेलियन टीमचा कर्णधार टीम पेन याने हा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे जगात एक वेगळा संदेश जाईल, असं देखील टीम पेनचं म्हणणं आहे. पण नक्की असं काय वेगळं घडणार आहे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या एकदिवसीय मालिकेमध्ये?
नक्की ठरलंय काय?
भारताचा संघ ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामन्यांप्रमाणेच एकदिवसीय सामने देखील खेळणार आहे. एकदिवसीय सामन्यांच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाचा पूर्ण संघ मैदानावर अनवाणी अर्थात पायात बूट न घालताच उतरणार आहे. मैदानात हे सर्व खेळाडू गोलाकार उभे राहतील. आणि त्यानंतर बूट घालून सामन्याला सुरुवात करतील.
अनवाणी येण्याचं कारण काय?
भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ अनवाणी मैदानावर उतरणार असल्याचं कर्णधार टीम पेन यानं जाहीर केलं. त्याविषयी सांगताना पेन म्हणतो, ‘जगभरातल्या वंशभेदाचा निषेध करण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघानं हा निर्णय घेतला आहे. आम्ही अनवाणी मैदानात उतरून गोलाकार उभे राहू. प्रत्येक सीरीजच्या सुरुवातीला आम्ही असं करणार आहोत. हे आमच्यासाठी सोपं आहे. वंशभेदाचा निषेध करण्यासाठी आम्ही असं करणार आहोत. याआधी आम्ही याची सुरुवात करू शकलो नाही, पण आता आम्ही ते करणार आहोत. हा वंशभेदाविरोधातला आमचा छोटासा प्रयत्न असेल.’
काही महिन्यांपूर्वी अमेरिकेमध्ये एका कृष्णवर्णी व्यक्तीची हत्या झाल्यानंतर त्याविरोधात मोठं आंदोलन पेटलं. जगभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळाला. Black Lives Matter या नावाखाली हे आंदोलन पसरलं. या पार्श्वभूमीवर टीम ऑस्ट्रेलियाने घेतलेल्या या निर्णयाचं कौतुक होत आहे.