भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या दिवसाअखेर ९ बाद २५० इतकी धावसंख्या उभारली आहे. एका बाजूला झटपट विकेट पडत असताना चेतेश्वर पुजाराने अप्रतिम शतक झळकावले. त्याने २४६ चेंडूंत १२३ धावांची खेळी केली.
भारताची खराब सुरुवात
भारताच्या फलंदाजीची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर लोकेश राहुल (२) आणि मुरली विजय (११) हे दोघे लवकर माघारी परतले. तर कर्णधार विराट कोहली (३) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे (११) हे दोघेही खेळपट्टीवर फारकाळ टिकाव धरू शकले नाहीत. त्यामुळे भारताची अवस्था ४ बाद ४१ अशी होती. पण यानंतर पुजारा आणि रोहित शर्मा यांनी ४५ धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरला. रोहितने चांगली फलंदाजी करत ३७ धावा केल्या. लायनला षटकार मारण्याच्या नादात तो बाद झाला. तर रिषभ पंत २५ धावांवर बाद झाला.
अश्विन-पुजाराची चांगली भागीदारी
रविचंद्रन अश्विन आणि चेतेश्वर पुजारा यांनी भारताचा डाव सावरला. त्यांनी सातव्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. अश्विन चांगली फलंदाजी करत होता. पण २५ धावांवर त्याला हेझलवूडने बाद केले. मात्र पुजाराने आपली चांगली फलंदाजी सुरु ठेवली. त्याने मिचेल स्टार्कच्या चेंडूवर दोन धावा काढत आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील १६ वे शतक होते. मात्र १२३ धावांवर असताना कमिन्सने त्याला धावचीत केले. तो बाद झाल्यानंतर पंचानी दिवस संपवण्याचा निर्णय घेतला.
There it is, a brilliant ton for Cheteshwar Pujara from 231 balls!
That’s his 16th hundred in Test cricket and third against Australia.#AUSvIND | @Domaincomau pic.twitter.com/cD1rSObzGq
— cricket.com.au (@cricketcomau) December 6, 2018