घरक्रीडाआम्ही मर्यादा सोडून वागणार नाही ! - विराट कोहली

आम्ही मर्यादा सोडून वागणार नाही ! – विराट कोहली

Subscribe

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेत दोन्ही संघांचे खेळाडू मर्यादा सोडून वागणार नाहीत असा विश्वास भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केला आहे. 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ एकमेकांसमोर आले की वादविवाद होतातच. तसेच दोन्ही संघांतील खेळाडू नेहमीच आक्रमकपणा दाखवतात. मात्र ही आक्रमकता कधीकधी मर्यादेबाहेर जाण्याची भीती असते. पण या मालिकेत दोन्ही संघांचे खेळाडू मर्यादा सोडून वागणार नाहीत असा विश्वास भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केला आहे.

दोन्ही संघ पूर्वीसारख्या चुका करणार नाहीत  

सामन्याच्या एक दिवस आधी विराट म्हणाला, “पूर्वी दोन्ही संघांतील खेळाडू मर्यादा सोडून वागले आहेत. पण यावेळी तसे होईल असे मला वाटत नाही. मात्र हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट आहे. यामध्ये खेळाडू सामने जिंकण्यासाठी खेळत असतात. त्यामुळे गोलंदाज फक्त चेंडू टाकून निघून जातील असे मला वाटत नाही. जेव्हा एखादा फलंदाज चांगली फलंदाजी करत असेल तेव्हा त्याचे लक्ष विचलित करण्यासाठी गोलंदाज त्याला भडकवण्याचा प्रयत्न करतील. पण हे ऑस्ट्रेलियाचाच संघ करतो असे नाही. फलंदाजाचे लक्ष विचलित करण्यासाठी प्रत्येक संघ फलंदाजांशी पंगा घ्यायचा प्रयत्न करतो. पण यावेळी दोन्ही संघ पूर्वीसारख्या चुका करणार नाहीत आणि  मर्यादा सोडून वागणार नाहीत असा मला विश्वास आहे.”

ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवणे अवघड   

या मालिकेत बॉल टॅम्परिंगमुळे बंदी घातलेले ऑस्ट्रेलियाचे प्रमुख फलंदाज स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर खेळू शकणार नसल्याने भारताचे पारडे जड मानले जात आहे. असे असले तरी ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवणे सोपे नसले असे विराटाचे मत आहे. “ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवणे अवघड आहे. त्यांच्याकडे अजूनही खूप चांगले खेळाडू आहेत, जे त्यांना सामने जिंकवून देऊ शकतात. त्यामुळे आम्ही त्यांना कमी लेखण्याची चूक करणार नाही.”
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -