आशिया चषकात भारताचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. भारताने या स्पर्धेत अजून एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे या सामन्याआधीच भारताने स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर अफगाणिस्तानने या स्पर्धेत चांगले प्रदर्शन केले असले तरी त्यांना सामने जिंकण्यात अपयश आले आहे.
भारतीय संघात बदल होण्याची शक्यता
भारताने ‘सुपर ४’ या फेरीत आधी बांगलादेश आणि नंतर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करत या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता आहे. फलंदाज लोकेश राहुल आणि खलील अहमद या दोघांना या सामन्यात संधी मिळण्याची सर्वात जास्त शक्यता आहे. खलील अहमदला या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात संधी मिळाली होती. हॉंगकॉंगविरुद्धच्या सामन्यातून खलीलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या सामन्यात त्याने ३ विकेट घेत भारताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती. तर शिखर धवनला विश्रांती देऊन लोकेश राहुलला भारतीय संघात स्थान मिळू शकेल.
अफगाणिस्तान सामने जिंकण्यात अपयशी
अफगाणिस्तानने या स्पर्धेत चांगले प्रदर्शन केले आहे. त्यांनी साखळी फेरीत श्रीलंकेला पराभूत केले होते. ‘सुपर ४’ फेरीत पाकिस्तानने अवघे ३ चेंडू बाकी असताना अफगाणिस्तानचा पराभव केला. तर या फेरीच्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने अफगाणिस्तानचा फक्त ३ धावांनी पराभव केला होता. त्यामुळे ते स्पर्धेतून भर झाले आहेत. पण भारताचा पराभव करून ही स्पर्धा संपवण्याचा अफगाणिस्तानचा मानस असेल हे निश्चित.