भारताचा राष्ट्रीय खेळ असणाऱ्या हॉकीची ‘हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी’ ही स्पर्धा नुकतीच सुरू झाली आहे. नेदरलँडच्या ब्रेडा शहरात ही स्पर्धा सुरू असून भारताने आपल्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानवर ४-०च्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. ही स्पर्धा हॉकी जगतातील एक मानाची स्पर्धा मानली जाते. मात्र या स्पर्धेचे हे शेवटचे वर्ष असल्याचे आंतरराष्ट्रीय हॉकी परिषदेकडून जाहीर करण्यात आले आहे.
FT| The Indian Men’s Team show supreme composure to defeat Pakistan by a resounding 4-0 margin in their first game of the Rabobank Men’s Hockey Champion Trophy 2018 on 23rd June 2018, featuring immense fortitude in attack and defense.#IndiaKaGame #INDvPAK #HCT2018 pic.twitter.com/U8V0N5BQRl
— Hockey India (@TheHockeyIndia) June 23, 2018
सामन्याच्या सुरुवातीपासूनच पाकिस्तानने आक्रमक खेळ सुरू केला तर भारताने धिम्या गतीने सुरुवात करत पाकिस्तानचा खेळ समजण्याचा प्रयत्न केला. भारताकडून २५व्या मिनिटाला रमणदीप सिंहने अप्रतिम गोल करत भारताचे सामन्यात खाते खोलले. यानंतर हाफ टाईमपर्यंत दोन्ही संघांनाही एकही गोल करता आला नाही. सामन्याच्या उत्तरार्धात पाकिस्तानकडून काही आक्रमणं करण्यात आली खरी, मात्र भारताच्या उत्तम बचावफळीपुढे पाकिस्तानला एकही गोल करता आला नाही. यानंतर भारताच्या १७ वर्षीय दिलप्रीतने ५४ व्या मिनिटाला गोल करत भारताला आणखी एक आघाडी मिळवून दिली. लगेचच ५७ व्या मिनिटाला मनदीप सिंहने गोल केला तर ललित उपाध्यायने अगदी सामन्याच्या शेवटच्या काही क्षणांत गोल करत भारताला ४-० ने विजय मिळवून दिला.
पाकिस्तानचा गोल झाला खरा पण…
हाफ टाईमच्या सुरुवातीस पाकिस्तानने गोल करत सामन्यात बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय खेळाडूंनी घेतलेल्या आक्षेपामुळे, मैदानातील पंचांनी निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपावला. यांनतर तिसऱ्या पंचांनी पाकिस्तानचा गोल रद्द ठरवण्याचा निर्णय दिला. यानंतर सामन्याच्या शेवटपर्यंत पाकिस्तानला एकही गोल करता आला नाही.
हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीचे हे शेवटचे वर्ष असल्याने स्पर्धेतील सर्वच संघ ही स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतील. भारताची पुढची लढत रिओ ऑलिम्पिक स्पर्धा जिंकलेल्या अर्जेंटिनासोबत होणार आहे.