आयपीएलचा तेरावा हंगामासाठी बीसीसीआयसमोरचा रस्ता आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये आयपीएल होणार आहे. युएई प्रवासाची परवानगी केंद्र सरकारने भारतीय खेळाडूंना दिली आहे. दरम्यान, स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. नवीन वेळापत्रकानुसार अंतिम सामना १० नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. याचसोबत सर्व सामने हे रात्री साडे सात वाजता सुरु होणार आहेत. PTI या वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.
Indian Premier League’s Governing Council approves COVID-19 replacements during the tournament to be held in UAE
— Press Trust of India (@PTI_News) August 2, 2020
आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या आयोजनाबद्दल रविवारी गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक पार पडली. दरम्यान, याआधी तेराव्या हंगामाचा अंतिम सामना हा ८ नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार होता. परंतू कोरोनाच्या धर्तीवर तयार करण्यात आलेले नवीन नियम, भारतीय संघाचा आगामी ऑस्ट्रेलिया दौरा आणि दोन सामन्यांमध्ये खेळाडूंना पुरेसा वेळ मिळावा यासाठी स्पर्धेच्या अंतिम सामन्याची तारीख बदलून ८ ऐवजी १० करण्यात आली आहे. शिवाय, सध्याच्या हंगामासाठी VIVO हीच कंपनी स्पर्धेची मुख्य स्पॉन्सर म्हणून असणार आहे.
IPL to start on September 19, final on November 10
— Press Trust of India (@PTI_News) August 2, 2020
IPL Governing Council decides to retain all sponsors of the event, including Chinese companies
— Press Trust of India (@PTI_News) August 2, 2020
आयपीएलच्या सामन्यांमध्ये प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी मिळणार का यावरही गव्हर्निंग काऊन्सिलच्या सदस्यांनी माहिती दिली. खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी मैदानात प्रेक्षक असणे चांगलच आहे. परंतू कोरोनाच्या संकटात खेळाडू आणि पर्यायाने प्रेक्षकांची सुरक्षा हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. यासाठी युएई क्रिकेट संघटनेसोबत चर्चा करुन योग्यवेळी निर्णय घेतला जाईल, असं गव्हर्निंग काऊन्सिलच्या सदस्यांनी सांगितलं. दरम्यान, गव्हर्निंग काऊन्सिलने सर्व संघमालकांना खेळाडूंच्या व्हिसाची प्रक्रिया सुरु करण्याचेही आदेश दिले आहेत.