भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाने टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडच्या संघाला ३६ धावांनी पराभूत केले आहे. या विजयासहच भारतीय संघाने आपल्या सामर्थ्याचा साक्षात्कार जगाला दाखवून दिला आहे. भारतीय संघाची या स्पर्धेतील कामगिरी उत्कृष्ठ ठरली. अंतिम सामन्याअगोदर भारताचा सामना पाकिस्तानच्या संघासोबत झाला होता. या सामन्यातही भारताने पाकिस्तानला ८ विकेट्सनी पराभूत केले होते. त्यानंतर अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडवर मात केली. या सामन्यात कुणाल फणसे, सुग्नेश महेंद्र आणि रवींद्र संतेचे यांची कामगिरी उल्लेखणीय ठरली.
भारताची जोरदार सुरवात
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रविंद्र संतेने दमदार अर्धशतक पटकावले. सलामीवीर कुणाल फणसे याने संयमाची खेळी खेळत ३६ धावा केल्या. कुणाल आणि कर्णधार विक्रांत केणी यांनी तिसऱ्या विकेट्ससाठी तब्बल ६७ धावांची भागीदारी केली. विक्रांतने २९ धावा केल्या. त्यानंतर सुग्नेश महेंद्रनने जोरदार फटकेबाजी केली. त्याने चार षटकार लगावले. त्याने ३३ धावा केल्या. त्याच्या या फटकेबाजीसह भारताने २० षटकांत ७ बाद १८० धावा केल्या.
इंग्लंडला पळता भुई थोडी झाली
भारताने दिलेल्या १८१ धावांच्या आव्हानाला सामोरे जाताना यजमान इंग्लंडच्या संघाला पळता भुई थोडी झाली. भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे इग्लंडचा संघ फार काळ नाही टिकला. इग्लंडची १२९ धावांवर ९ विकेट्स अशी परिस्थिती होती. मात्र, शेवटच्या खेळाडूंनी टिकून राहण्याचा निर्धार केला. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. कारण शेवटचे २ षटके खेळूनही इंग्लंडचा ३६ धावांनी पराभव झाला.
हेही वाचा – भारताच्या दिव्यांग क्रिकेट खेळाडूंनी पाकिस्तानला लोळवले