फिरकीपटू एकता बिश्तच्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने तिसर्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ६ धावांनी मात केली. या विजयामुळे भारताने ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका ३-० अशी जिंकली. भारतीय महिलांनी पहिला सामना ८ विकेट राखून, तर दुसरा सामना ५ विकेट राखून जिंकला होता.
तिसर्या सामन्यात भारताची कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा डाव ४५.५ षटकांत १४६ धावांवर आटोपला. भारताकडून हरमनप्रीत कौर (३८), शिखा पांडे (३५), पूनम राऊत (१५), मानसी जोशी (१२) आणि मिताली (११) यांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. हरमनप्रीत आणि शिखा यांनी सातव्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. दक्षिण आफ्रिकेच्या मॅरिझेन कापने ३, तर शबनिम इस्माईल आणि आयाबाँगा खाका यांनी २-२ बळी मिळवले.
१४७ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने चांगली सुरुवात केली. त्यांनी २ बाद ५० अशी धावसंख्या होती. मात्र, यानंतर त्यांनी ठरावीक अंतराने विकेट्स गमावल्या आणि त्यांचा डाव १४० धावांत आटोपला. दक्षिण आफ्रिकेकडून काप (२९), कर्णधार सून लूस (२४) आणि सलामीवीर वोल्वर्ड (२३) यांनी चांगली फलंदाजी केली. भारताच्या एकता बिश्तने ३२ धावांत ३ बळी घेतले.