मुंबईत रंगणार भारत विरुद्ध न्युझीलंड सामना
भारतात सुरू असलेल्या इंटरकॉन्टिनेंटल कपमध्ये भारताची आतापर्यंतची कामगिरी उत्तम राहिली आहे. पहिल्या दोन सामन्यात चायनीज ताईपेई आणि केनियाला हरवून भारताने स्पर्धेत अव्वल स्थान मिळवलंय. अंतिम सामन्यात जाण्यासाठी भारताला आजचा न्यूझीलंडसोबतचा सामना जिंकणे गरजेचे आहे. आजचा सामना अंधेरीच्या ‘मुंबई फुटबॉल अरेना’ या मैदानावर होणार आहे.
कपमधील आजची लढत चुरशीची
आज इंटरकॉन्टिनेंटल कपमधील एक महत्वाचा सामना मुंबईत रंगणार आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांची आतापर्यंतची कामगिरी अप्रतिम आहे. भारतीय संघ सहा पॉईंटसह स्पर्धेत अव्वल स्थानावर असला तरी ३ पॉईंटसह दुसऱ्या स्थानावर न्यूझीलंड विराजमान आहे.
सुनील छेत्रीच्या ट्विटनंतर सामन्यांना अप्रतिम प्रतिसाद
भारताच्या पहिल्या सामन्याला १८हजारची क्षमता असणाऱ्या मैदानात केवळ २ हजार ५६९ भारतीयांनी हजेरी लावली. यामुळे निराश झालेल्या भारताच्या कर्णधार सुनील छेत्रीने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ टाकला. यात त्याने भारतीय प्रेक्षकांना सामन्यांना हजेरी लावण्याची विनंती केली.
This is nothing but a small plea from me to you. Take out a little time and give me a listen. pic.twitter.com/fcOA3qPH8i
— Sunil Chhetri (@chetrisunil11) June 2, 2018
त्याच्या या ट्विटला सर्वच स्तरातून पाठिंबा मिळाला. सचिन तेंडुलकर, विराट कोहली, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह स्पेनच्या प्रसिध्द अशा ‘ला लीगा’ या प्रिमियर लीगने देखील ट्विटरवरून छेत्रीच्या आवाहनाला आपला पाठिंबा दर्शविला. ज्याचा परिणाम भारताच्या दुसऱ्या लढतीत दिसून आला. प्रेक्षकांनी मैदान अक्षरश: हाऊसफुल्ल करुन टाकले. तब्बल १८ हजार प्रेक्षक हा सामना पाहायला मैदानात आले होते. विशेष म्हणजे भारताच्या पुढील सर्व सामन्यांची तिकीटं अॉलरेडी बुक झाली आहेत. अशाप्रकारे भारतीयांनी सुनील छेत्रीच्या ट्विट विनंतीला उस्फुर्त प्रतिसाद दाखवला आहे.