रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) संघ दमदार कामगिरी करू शकतो, यावर अजूनही बऱ्याच लोकांचा विश्वास नाही, असे या संघाचा कर्णधार विराट कोहलीला वाटते. आरसीबी हा आयपीएल स्पर्धेतील सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक आहे. आरसीबीच्या संघात कोहलीसह एबी डिव्हिलियर्स, युजवेंद्र चहल यांसारख्या खेळाडूंचा समावेश असूनही त्यांना अजून एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावता आलेले नाही. यंदाच्या मोसमात मात्र या संघाने सातत्यपूर्ण खेळ केला आहे. त्यांनी दहा पैकी सात सामने जिंकले असून गुणतक्त्यात १४ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. बुधवारी झालेल्या सामन्यात आरसीबीने कोलकाता नाईट रायडर्सवर मात केली. त्यांनी कोलकाताला केवळ ८४ धावांवर रोखले आणि हे लक्ष्य ३९ चेंडूत शिल्लक असतानाच गाठले. आरसीबीकडून मोहम्मद सिराजने तीन विकेट घेतल्या.
ही गोष्ट सर्वात महत्त्वाची
सिराजला नव्या चेंडूने गोलंदाजी करायला देण्याचा निर्णय आम्ही खूप उशिराने घेतला. मी वॉशिंग्टन सुंदरला नवा चेंडू देण्याच्या विचारात होतो. मात्र, आम्ही काय नवे करू शकतो? याबाबत मी विचार केला आणि सिराजला गोलंदाजी दिली. आमच्याकडे प्लॅन ‘ए’, प्लॅन ‘बी’ तयार असतात. आमचे खेळाडू आता योजनेनुसार खेळ करत आहेत. त्यामुळेच आम्हाला यंदाच्या मोसमात यश मिळत आहे. मात्र, अजूनही बऱ्याच लोकांना आरसीबी संघाच्या दमदार कामगिरी करण्याच्या क्षमतेवर विश्वास नाही. परंतु, आमच्या ड्रेसिंग रूममधील प्रत्येक व्यक्तीला आमच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. ही गोष्ट आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. तुमच्याकडे केवळ चांगले खेळाडू असून उपयोग नाही, असे कोहली कोलकाताविरुद्धच्या सामन्यानंतर म्हणाला.
That’s a BIG WIN for #RCB here in Abu Dhabi as they beat #KKR by 8 wickets.#Dream11IPL pic.twitter.com/qgNXRFpzYE
— IndianPremierLeague (@IPL) October 21, 2020