भारत-चीन सीमेवरील वाढत्या तणावामुळे भारतात चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच भारत सरकारने बऱ्याच चिनी अॅप्सवर बंदीही घातली आहे. असे असतानाही बीसीसीआयने चिनी मोबाईल कंपनी ‘विवो’ला इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचे मुख्य प्रायोजक म्हणून कायम ठेवले होते. मात्र, बीसीसीआयच्या निर्णयावर बरीच टीका झाल्यानंतर त्यांनी यावर्षी विवोसोबतचा करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आता प्रायोजक शोधण्याची चिंता करण्यापेक्षा बीसीसीआयने एकही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असणार नाही यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. अन्यथा ही स्पर्धा रद्द करावी लागू शकेल, अशी भीती किंग्स इलेव्हन पंजाबचे सह-संघमालक नेस वाडिया यांना वाटत आहे.
सुरक्षिततेची काळजी वाटत आहे
आयपीएलचे मुख्य प्रायोजक कोण असणार, बीसीसीआय सध्याच्या प्रयोजकांसोबतचा करार मोडणार का, याबाबत सध्या बरीच चर्चा होत आहे. या विषयावर इतकी चर्चा करण्याची काहीच गरज नाही. आम्हाला (संघमालकांना) एक गोष्ट माहित आहे आणि ती म्हणजे यंदा आयपीएल स्पर्धा होणार आहे. आम्हाला खेळाडू आणि या स्पर्धेशी संबंधित असणाऱ्या इतर सर्व व्यक्तींच्या सुरक्षिततेची काळजी वाटत आहे. एकही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्यास आयपीएल स्पर्धा रद्द करावी लागू शकेल, असे वाडिया म्हणाले.
नवे प्रायोजक नक्की मिळतील
‘विवो’ यावर्षी आयपीएलचे मुख्य प्रायोजक नसतील अशी घोषणा बीसीसीआयने गुरुवारी केली. परंतु, विवोने करार मोडला असला तरी त्यांची जागा घेऊ शकतील असे नवे प्रायोजक बीसीसीआयला मिळतील याची नेस वाडिया यांना खात्री आहे. बीसीसीआयने मुख्य प्रयोजकांबाबत काय निर्णय घेतला आहे, हे मला ठाऊक नाही. परंतु, आम्ही (संघमालकांनी) बीसीसीआयला पाठिंबा देण्याची गरज आहे. सध्याच्या परिस्थितीत नवे प्रायोजक मिळवणे सोपे नाही, पण पर्याय नक्की उपलब्ध होतील. यंदाचे आयपीएल हे आतापर्यंतचे सर्वोत्तम असेल. त्यामुळे जे प्रायोजक करार मोडतील, ते अखेरीस मूर्ख ठरतील, असे वाडिया यांनी नमूद केले.