लोकांच्या बोलण्याला मी पूर्वी खूप महत्व द्यायचो. मात्र, आता मला लोकांच्या टीकेने काहीच फरक पडत नाही, असे इंग्लंडचा अष्टपैलू बेन्स स्टोक्स म्हणाला. स्टोक्स सध्या आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत आहे. यंदा स्टोक्स वैयक्तिक कारणामुळे सुरुवातीच्या काही सामन्यांत खेळला नव्हता. मात्र, रविवारी झालेल्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने ६० चेंडूत नाबाद १०७ धावांची खेळी केली होती. त्याच्या या खेळीत १४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीच्या जोरावर राजस्थानने हा सामना ८ विकेट राखून जिंकला.
प्रत्येकावर वेगवेगळा परिणाम
स्टोक्स सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम अष्टपैलू म्हणून ओळखला जातो. मागील वर्षी इंग्लंडने पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकला होता आणि इंग्लंडच्या या यशात स्टोक्सने महत्वाची भूमिका बजावली होती. मात्र, मागील काही वर्षांत स्टोक्सच्या कारकिर्दीत बरेच चढ-उतार आले आहेत. खासकरून अपयशावर तू कशी मात केली आहेस, असे विचारले असता स्टोक्सने सांगितले, लोकांच्या बोलण्याचा प्रत्येकावर वेगवेगळा परिणाम होतो. सुरुवातीला लोकांच्या म्हणण्याला मी खूप महत्व द्यायचो आणि याचा परिणाम माझ्या खेळावर व्हायचा. लोक काय म्हणतात हे महत्वाचे नसते, हे कळण्यासाठी मला वेळ लागला. तुम्ही ज्या संघासाठी खेळत असता, त्या संघातील सदस्यांना किंवा तुमच्यावर आणि तुमच्या कारकिर्दीवर ज्यांचा प्रभाव आहे, त्यांना तुमच्याविषयी काय वाटते, याला महत्व दिले पाहिजे. आता मी हेच करतो.
Outside noise doesn’t matter to me anymore: @benstokes38
In a post-match chat with @IamSanjuSamson, Ben Stokes speaks about what’s kept him going all these years & how he’s managed to put up meaningful performances for his team.
WATCH 📹https://t.co/ICgxBekdf1 #Dream11IPL pic.twitter.com/1DiFwmvxQy
— IndianPremierLeague (@IPL) October 26, 2020