भारताचा तडाखेबाज सलामीवीर शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्यामुळे रिषभ पंतची आता टीम इंडियामध्ये वर्णी लागली आहे. मंगळवारी रात्री बीसीसीआयकडून परवानगी मिळताच पंत बुधवारी इंग्लंडला पोहोचणार आहे. सध्यातरी ट्रेनिंगसाठी नेट्समध्ये तो टीमची साथ देईल, गुरुवारी होणाऱ्या न्युझीलंड विरुद्धच्या सामन्यात त्याची गरज असल्याचा त्याचा समावेश केला जाईल, अशी माहिती मिळत आहे.
#ICCCricketWorldCup2019: Rishabh Pant to join Team India as cover for injured Shikhar Dhawan pic.twitter.com/AosEBB6caE
— Doordarshan News (@DDNewsLive) June 12, 2019
बीसीसीआयने दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये सांगितले की, “टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन सध्या मेडीकल टीमच्या देखरेखीखाली आहे. टीम मॅनेजमेंटने ठरविल्याप्रमाणे धवन इंग्लंडमध्येच राहणार असून त्याच्या तब्येतीवर नजर ठेवली जाणार आहे.” मेडीकल रिपोर्टनुसार धवन फक्त दोन आठवडे खेळू शकत नाही, त्याची दुखापत फार मोठी नाही. शिखर धवनच्या गैरहजेरीत के.एल.राहुल हा रोहित शर्मासोबत सलामीला उतरू शकतो.
के.एल. राहुल सलामीला गेल्यानंतर प्रश्न उरतो तो म्हणजे आता मधल्या फळीत बॅटींग कोण करणार? कदाचित दिनेश कार्तिक किंवा विजय शंकर ही जागा घेऊ शकतो. विजय शंकरला संधी दिल्यास तो मध्यम गतीने गोलंदाजीसुद्धा करू शकतो.
रिषभ पंतचे वर्ल्डकपमध्ये खेळण्याचे स्वप्न पुर्ण झाले असले तरी भारताचा माजी फिरकीपटू गोलंदाज हरभजनने यावर वेगळे मत व्यक्त केले आहे. तो म्हणाला की, अंजिक्य रहाणे हा उत्तम पर्याय ठरू शकला असता. रहाणे इंग्लंडमध्ये अनेकवेळा खेळला आहे. मधल्या फळीत नंबर ३ आणि ४ वर फलंदाजी करण्याचा त्याला चांगला अनुभव आहे. २०१५ च्या वर्ल्डकपमध्ये त्याने चांगला खेळ खेळला होता.