विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने चांगली कामगिरी केली. मात्र उपांत्य फेरीत थोड्यासाठी भारतीय संघाचा पराभव झाला. या सामन्यात महेंद्र सिंह धोनीला चौथ्या पदावर न पाठवल्यामुळे विराट कोहली आणि भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर टीका होत होती. त्याचबरोबर भारतीय संघात दोन गट पडल्याची बाब याअगोदरही उघड झाली आहे. एक गट विराट कोहलीचा तर दुसरा गट रोहित शर्माचा आहे. त्यामुळे बीसीसीआयने मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी आणि कसोटी सामन्यासाठी वेगळा कर्णधार नेमण्याचा विराच करत आहे.
‘रोहित शर्मा बनू शकतो कर्णधार’
बीसीसीआय बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने आयएएनएस या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बीसीसीआयकडून भारतीय संघाचा कर्णधार बदलण्याची शक्यता आहे, असे म्हटले आहे. यापुढे ते म्हणाले की, ‘एखादी स्पर्धा संपल्यावर दुसऱ्या स्पर्धेची तयारी करणाऱ्या संघानाच चांगले संघ म्हणतात. विश्वचषकात जिंकलेला इंग्लंड हा संघ देखील त्याचेच एक उदाहरण आहे. त्यामुळे पुढच्या स्पर्धा लक्षात ठेवून भारतीय संघ तयारीला लागेल. येत्या एकदिवसीय सामन्यांची जबाबदारी रोहितकडे जाऊ शकते. तर कसोटी सामन्यांची जबाबदारी विराट कोहलीकडे असू शकते.’ त्याचबरोबर रोहित शर्मा कर्णधार पदासाठी योग्य असल्याचे अधिकाऱ्याने म्हटले आहे.
हेही वाचा – इंग्लंडच्या विजयावर दिग्गजांनी आयसीसीला विचारले प्रश्न