पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आज पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार सरफराज अहमद याची कर्णधार पदावरून उचलबांगडी केली आहे. टी-२० आणि कसोटी क्रिकेटसाठी आता सरफराज अहमद कर्णधार असणार नाही. त्यांच्या ज्यागी पाकिस्तानचा उभरता बॅट्समन अझहर अलीची कसोटी क्रिकेट तर बाबर आझमची टी-२० क्रिकेटसाठी कर्णधार म्हणून निवड केली आहे. यासोबतच आगामी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर देखील त्याला संघात स्थान दिलेले नाही. विकेट किपर आणि बॅट्समन असलेल्या सरफराजला स्थानिक क्रिकेटमधूनही त्याला निवृत्ती घेण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितले आहे.
JUST IN: Sarfaraz Ahmed has been removed as Pakistan's Test and T20I captain. Azhar Ali and Babar Azam will replace him. pic.twitter.com/3OhXWYbrCG
— ICC (@ICC) October 18, 2019
२०१६ भारतात झालेल्या आयसीसी टी-२० वर्ल्ड कपपासून सरफराजकडे पाकिस्तानचे टी-२० चे नेतृत्व देण्यात आले होते. त्यानंतर २०१७ मध्ये त्याकडे एकदिवसीय सामन्यांचेही कर्णधारपदही देण्यात आले होते. सरफराजच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने भारताच्या विरोधात २०१७ साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.
गेल्या अनेक दिवसांपासून सरफराजचा बॅटिंगमधील खराब फॉर्म सुरु आहे. याच कारणामुळे त्याची टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधील कर्णधारपद काढून घेण्यात आले आहे. पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक आणि निवड समितीचे प्रमुख असलेल्या मिसबाह-उल-हक हे सरफराजच्या कामगिरीवर नाखूश होते. नुकत्याच झालेल्या श्रीलंके विरोधातील मालिकेत पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागला होता. नवख्या श्रीलंकन टीमकडून झालेला पराभव पाकिस्तानच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.
यावर्षीच्या सुरुवातीपासूनच पाकिस्तान क्रिकेट गोंधळाच्या स्थितीमध्ये आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच दक्षिण आफ्रिकेकडून त्यांना हार पत्करावी लागली होती. त्यानंतर लागोपाठ ११ एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला. यामध्ये अबु धाबी येथे ऑस्ट्रेलियाकडून ०-५ ने हरलेली एकदिवसीय मालिका देखील आहे.
वर्ल्ड कपमधील पाकिस्तानची कामगिरी निराशाजनक झाली होती. भारतासोबत झालेल्या सामन्यात तर जांभई दिल्यामुळे सरफराज चांगलाच ट्रोल झाला होता. वर्ल्ड कपमध्ये ११ गुण मिळवत पाकिस्तान पाचव्या स्थानावर राहिला होता. तेव्हापासूनच सरफराजला हटविण्याची मागणी जोर धरू लागली होती.