भारताच्या महिला बॅडमिंटन खेळाडू अश्मिता चलिहा आणि गायत्री गोपीचंद यांनी नेपाळमध्ये सुरु असलेल्या तेराव्या दक्षिण आशियाई स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या दोघींमध्ये अंतिम सामना होणार असल्याने भारताला एकतरी सुवर्णपदक मिळणार हे निश्चित झाले आहे. अव्वल सीडेड अश्मिताने उपांत्य फेरीच्या सामन्यात श्रीलंकेच्या अचिनी रत्नासिरीवर २१-५, २१-७ अशी मात केली. गायत्रीने श्रीलंकेच्याच दिल्मी डायसचा २१-१७, २१-१४ असा पराभव करत महिला एकेरीची अंतिम फेरी गाठली.
पुरुष एकेरीतही भारताच्या बॅडमिंटनपटूंनी दमदार खेळ केला. भारताच्या आर्यमान टंडन आणि सिरील वर्मा यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारताचे आणखी एक सुवर्णपदक निश्चित केले. उपांत्य फेरीत अव्वल सीडेड सिरीलने श्रीलंकेच्या दिनूका करुणरत्नेला २१-९, २१-१२ असे, तर आर्यमानने दुसर्या सीडेड नेपाळच्या रत्नजीत तमंगला २१-१८, १४-२१, २१-१८ असे पराभूत केले.
पुरुष दुहेरीत कृष्णा गार्गा आणि ध्रुव कपिलाने पाकिस्तानच्या मोहम्मद अतिक आणि राजा मोहोम्मद हसनैनवर २१-१५, २१-७ अशी मात करत अंतिम फेरी गाठली. त्यांचा अंतिम फेरीत श्रीलंकेच्या डायस अंगोडा विदानलागे आणि थारिंदू दुल्लेवशी सामना होईल.