भारत आणि श्रीलंका यांच्यातील २०११ विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स होता, असा आरोप श्रीलंकेचे माजी क्रीडा मंत्री महिंदानंद अलुथगमगे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. अलुथगमगे यांनी केलेल्या आरोपांची श्रीलंकन सरकारने दखल घेत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर श्रीलंकन पोलिसांनी या प्रकरणाचा तपास लावण्यास सुरुवात केली. त्यांनी श्रीलंकेच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष अरविंद डी सिल्वा, माजी कर्णधार कुमार संगकारा आणि सलामीवीर उपुल थरंगा यांची चौकशी केली. मात्र, त्यात फारसे काही सापडले नाही. त्यामुळे पुराव्यांअभावी श्रीलंकन पोलिसांनी या प्रकरणाचा तपास थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रश्नांची समाधानकारक उत्तरे
तिघांनी आमच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. अंतिम सामन्यात बरेच बदल करण्यात आले होते. परंतु, हे बदल का करावे लागेल याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले. आम्हाला त्यांच्याविरोधात पुरावे मिळाले नाहीत, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या अंतिम सामन्यात श्रीलंकेने संघात चार बदल केले होते.
काय म्हणाले होते अलुथगमगे?
२०११ विश्वचषकाचा अंतिम सामना आपण (श्रीलंकेने) भारताला ‘विकला’ होता. मी त्यावेळी क्रीडा मंत्री होतो आणि तेव्हाही मी हेच म्हणालो होतो. आपण तो सामना जिंकला पाहिजे होता. तो सामना ‘फिक्स’ केला होता हे मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो. याबाबतची माहिती असणाऱ्या काही लोकांना मी ओळखतो, असे अलुथगमगे म्हणाले होते. त्यांनी केलेल्या आरोपांची श्रीलंकन सरकारने दखल घेत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते.