मार्नस लबूशेनच्या शतकानंतर ऑस्ट्रेलियन संघ मजबूत स्थितीत होता. मात्र, टी. नटराजनने दोन विकेट घेतल्यामुळे भारतीय संघ सामन्यात पुनरागमन करू शकला, असे विधान भारताचा ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदरने केले. शुक्रवारी ब्रिस्बन येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची ३ बाद २०० अशी धावसंख्या होती. मात्र, नटराजनने अखेरच्या सत्रात लबूशेन (१०८) आणि मॅथ्यू वेड (४५) या फलंदाजांना बाद केले. त्यामुळे पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची ५ बाद २७४ अशी धावसंख्या होती. या सामन्यात नटराजनला कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली आणि त्याने या संधीचा चांगला वापर केला.
First Test wicket for @Natarajan_91 👏.
Wade departs for 45.
Live – https://t.co/bSiJ4wW9ej #AUSvIND pic.twitter.com/Q0kOX0YCmb
— BCCI (@BCCI) January 15, 2021
तो अप्रतिम गोलंदाज
नटराजनने फारच चांगली गोलंदाजी केली. त्याच्यामुळे आम्ही सामन्यात पुनरागमन करू शकलो. लबूशेन आणि वेड यांनी मोठ्या धावा केल्या. परंतु, नटराजनने या दोघांना योग्य वेळी बाद केले. नटराजनसोबत कसोटी पदार्पणाची संधी मिळाल्याचा आनंद आहे. तो अप्रतिम गोलंदाज असून त्याने पहिल्या दिवशी कौतुकास्पद कामगिरी केली, असे सुंदर म्हणाला.
थोडे दडपण होते
तसेच कसोटीत पदार्पण करण्याविषयी सुंदरने सांगितले, कसोटी क्रिकेटमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी हा सामना खेळण्यासाठी खूप उत्सुक होतो. माझ्यावर थोडे दडपण होते. मात्र, पहिला चेंडू टाकल्यानंतर हे दडपण कमी झाले. मला जास्तीतजास्त चेंडू टाकून विकेट मिळवायच्या होत्या.