कसोटी क्रिकेट सामने अलिकडे निकाली ठरताहेत. पाच दिवसाचे कसोटी सामने जेमतेम 3-4 दिवसांतच निकाली ठरतात. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा सुरु झाल्यापासून विराट कोहलीचा भारतीय संघ सुसाट सुटला आहे. 360 गुणांसह भारतीय संघ अव्वल क्रमांकावर असून इतर संघ खूपच पिछाडीवर असून भारताची घोडदौड रोखणे इतर संघांना कठीण जाईल, असे सध्याचे चित्र आहे. विराट कोहलीच्या भारतीय संंघाने विंडीजला विंडीजमध्ये (2-0) द. आफ्रिका आणि बांगलादेशला मायदेशात (3-0) (2-0) असे खडे चारले. यंदाच्या मोसमात 34 कसोटी सामन्यांपैकी 11 सामन्यात डावाने विजय संपादण्यात आले. 8 सामन्यात 200 हून अधिक धावांनी जय मिळाले, तर 4 सामन्यात किमान 8 गडी राखून विजय मिळाले असून कसोटी सामने एकतर्फी ठरताहेत. वनडे (50 षटके) टी-20 क्रिकेटमुळे कसोटी सामने निकाली ठरताहेत. क्षेत्ररक्षणाचा दर्जा कमालीचा सुधारला आहे, धावा पळण्यातील (चिकी सिंगल्स) सफाई वाखाणण्याजोगीच.
चौकार-षटकारांची आतषबाजी, निर्धाव षटकेच नव्हे तर निर्धाव चेंडू टाकणे जिकीरीचे. अशा अनेक जमेच्या बाजू वनडे, टी-20 क्रिकेटमुळे आल्या. जगभरात टी-20 क्रिकेटचे अमाप पीक येत आहे. आयपीएल, बिगबॅश यातच आता भर पडेल ती इंग्लंडमधील 100 चेंडूच्या क्रिकेटची ! क्रिकेटच्या या अतिरेकामुळे कसोटी सामने निकाली ठरताहेत, परंतु त्यात चुरस अभावानेच आढळते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारत, ऑस्टे्रलिया सध्या तरी अव्वल क्रमांकावर आहेत. विराट कोहलीच्या भारतीय संघाने 7 पैकी 7 सामने जिंकून 360 गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला. ऑस्टे्रलियाने 7 पैकी 4 सामने जिंकले असून 2 सामन्यांत पराभवाला त्यांना सामोरे जावे लागले. एक सामना त्यांनी अनिर्णित राखला. 176 गुणांसह ऑस्ट्रेलिया दुसर्या क्रमांकावर आहे. डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथच्या पुनरागमनामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाजी बहरतेय. गोलंदाजी ही तर ऑस्टे्रलियाची नेहमीच जमेची बाजू ठरली आहे.
न्यूझीलंडचा संघ मायदेशात चांगली कामगिरी करतो. इंग्लंडला त्यांनी अलिकडेच हरवले. परंतु, केन विल्यमसनच्या न्यूझीलंडची पर्थ कसोटीत ऑस्टे्रलियाविरुध्द दाणादाण उडाली. मिचेल स्टार्कने त्यांचा निम्मा संघ गारद केला. 166 धावांतच किवीजचा डाव आटोपला. पर्थ कसोटीत न्यूझीलंडचा पराभव अटळ दिसतो. ट्रान्स-टास्मन सिरीजमध्ये कांगारुच बाजी मारतील अशी चिन्हे दिसताहेत. नूतन वर्षात फेब्रुवारी-मार्चमध्ये विराट कोहलीचा भारतीय संघ न्यूझीलंडचा दौरा करणार असून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेकडे सर्वांचे लक्ष असेल. इंग्लंड ही तर क्रिकेटची जननी. अलिकडे मात्र इंग्लंडची कसोटी क्रिकेटमधील परदेशातील कामगिरी खालावतच चालली आहे. न्यूझीलंड तसेच कमकुवत विंडीजकडूनही इंग्लंडवर पराभवाची आपत्ती ओढवली. परिणामी, विस्डेन करंडक गमावण्याची आफत त्यांच्यावर आली. कर्णधार जो रुटचा अपवाद वगळता इंग्लंडची फलंदाजी ठिसूळ वाटते. मायदेशात त्यांनी न्यूझीलंडवर विजय मिळवून वर्ल्डकप पटकावला. परंतु, कसोटी क्रिकेटमध्ये मात्र त्यांची डाळ शिजत नाही असे चित्र अलिकडे दिसून येते.
द.आफ्रिका संघाला अलीकडे गळती लागली असून दिवसेंदिवस त्यांची कामगिरी ढासळत चालली आहे.डेल स्टेन, हाशिम अमला, डिव्हिलीयर्ससारख्या प्रमुख, नामवंत खेळाडूंच्या निवृत्तीमुळे त्यांचा संघ कमकुवत झाला आहे. द.आफ्रिकन सरकारच्या राखीव जागांच्या धोरणाचा फटका देखील क्रिकेटला बसला असून उमेदीच्या काळात द.आफ्रिकेला गुडबाय करून इंग्लिश काऊंटी क्रिकेट खेळण्याला प्राधान्य देत असून द.आफ्रिकन क्रिकेटच्या अधोगतीचे ते एक प्रमुख कारण आहे. द. आफ्रिका क्रिकेट मंडळाच्या कारभारात पारदर्शकतेचा अभाव आढळतो. सुदैवाने यंदा द. आफ्रिकेत टी-20 क्रिकेट लीगला सुरुवात झाली असून त्यातून काही उमगते, होतकरु क्रिकेटपटू गवसतील अशी आशा आहे.
वेस्ट इंडीज क्रिकेटचा दबदबा आता पूर्वीप्रमाणे राहिला नसून अधून मधून टी-20 क्रिकेटमध्ये विंडीजचे खेळाडू चमक दाखवतात. परंतु, कसोटी क्रिकेटमध्ये मात्र त्यांची वाताहात झाली असल्याचे खेदपूर्वक नमूद करावेसे वाटते. ख्रिस गेलसारखा त्रिशकतवीर विंडीजकडून खेळणे टाळतो. पोलार्ड, ब्रावोेसारखे खेळाडू जगभरातील टी-20 क्रिकेट लिगमध्ये खेळतात. परंतु, मायदेषासाठी कसोटी क्रिकेट खेळणे ते टाळतात. जेसन होल्डर, हेटमायर, शाजी होप, निकलस पुरनसारख्या नवोदीत युवा खेळाडूंकडून विंडीजला मोठ्या अपेक्षा आहेत. कुमार संघकारा, महेला जयवर्धन, रंगना हेरथ सारख्या बुजुर्ग खेळाडूंच्या निवृत्तीनंतर श्रीलंकेने क्रिकेटला उतरती कळा लागली. दिमुथ करुणारत्नच्या श्रीलंकन संघाने द.आफ्रिकेला द आफ्रिकेतच 2-0 असे हरवून धक्कादायक विजयाची नोंद केली. परंतु, या अपवाद वगळता श्रीलंकन क्रिकेटला यंदा फारसे काही करता आले नाही.
पाकिस्तानला अस्थिरतेने ग्रासले असून त्याचे पडसाद क्रीडाक्षेत्रावर उमटले असून क्रिकेटला मोठा फटका बसला आहे. मिसबा उल हकच्या निवृत्तीनंतर पाक संघाला खमके नेतृत्व लाभलेले नाही. परिणामी त्यांची कामगिरी ढेपाळली. ऑस्टे्रलियाने त्यांना ऑस्टे्रलियातच सहज नमवले. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षणातील ढिलाई पाकला नडली. बाबर आझमचा अपवाद वगळता पाक फलंदाजी पार कोलमडली. वसीम अक्रम, वकार युनुस, शोएब अख्तर, साकलेन मुश्ताक, अझर मेहमूदसारख्या खेळाडूंची उणीव पाकला प्रकर्षाने जाणवते आहे. कसोटी क्रिकेटमध्ये बांगलादेशला गेल्या दोन दशकात आपला ठसा उमटवता आलेला नाही. त्याचीच प्रचिती यंदाच्या भारत दौर्यात आली. इंदौर कोलकाता (पिंक बॉल कसोटी) कसोटीत भारताने बांगलादेशला डावाचा मारा दिला. वनडे, टी-20 क्रिकेटमध्ये धाप पाडणार्या बांगलादेशला कसोटी क्रिकेटमध्ये प्रगती करण्यासाठी बरीच मेहनत करावी लागेल.