ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीत भारताचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजवर काही चाहत्यांनी वर्णद्वेषी टीका केली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना या दोघांवर वर्णद्वेषी टिपण्णी झाल्याची तक्रार भारतीय संघ आणि बीसीसीआयने सामनाधिकारी डेविड बून यांच्याकडे केली. मात्र, चौथ्या दिवशी पुन्हा त्याच चाहत्यांनी सिराजवर वर्णद्वेषी टीका केली. त्यामुळे सिराजसोबत जे झाले, ते अतिशय निंदनीय होते, असे सामन्यानंतर भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला.
Racism has no place in our great sport or in any walk of society. I’ve spoken to @CricketAus and they have ensured strict action against the offenders. @BCCI and Cricket Australia stand together. These acts of discrimination will not be tolerated. @SGanguly99 @ThakurArunS
— Jay Shah (@JayShah) January 10, 2021
आम्ही अधिकृत तक्रार केली असून सामनाधिकारी योग्य तो निर्णय घेतील. सामन्यादरम्यान जे झाले, त्याबाबत मी सामनाधिकारी आणि पंचांशी चर्चा केली. सिराजसोबत जे घडले, ते निंदनीय होते. जगात अशा गोष्टींना थारा नाही. आम्हाला या प्रकरणाची चीड आहे, असे रहाणेने नमूद केले. चौथ्या दिवशी चाहत्यांनी सिराजवर पुन्हा वर्णद्वेषी टीका केल्यानंतर सिराज आणि कर्णधार रहाणेने पंच पॉल रायफल यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर दोन्ही पंचांनी पोलिसांना सांगून या चाहत्यांना मैदानाबाहेर काढले. मात्र, या घटनेनंतरही भारतीय खेळाडूंनी संयम ठेवून हा सामना अनिर्णित राखल्याने कर्णधार रहाणेने सर्व खेळाडूंचे कौतुक केले.