यंदाचा IPL चा हंगाम चेन्नई सुपर किंग्जसाठी (CSK) काही फारसा चांगला राहिलेला नाही. आत्तापर्यंत कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने खेळलेल्या ९ मॅचमध्ये फक्त ३ विजय मिळवले आहेत, तर तब्बल ६ मॅचेसमध्ये माहीच्या चेन्नई सुपर किंग्जला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जचं यंदाच्या आयपीएलमध्ये काही खरं नाही, असा संवाद आपल्याला ऐकायला मिळू लागला आहे. नुकत्याच झालेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्जचं आव्हान जवळ जवळ सपुष्टात आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, अजूनही CSK ला प्लेऑफमध्ये जाण्याची संधी असून चेन्नईची पुढची वाटचाल आणि इतर संघांच्या कामगिरीवर चेन्नईचं आव्हान आता अवलंबून असेल.
प्लेऑफसाठी चेन्नईला काय करावं लागेल?
चेन्नई सुपर किंग्जचे आयपीएलमध्ये आता ५ सामने शिल्लक आहेत. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी चेन्नईला सर्वच्या सर्व ५ सामने किंवा किमान ४ सामने तरी जिंकावे लागणार आहेत. त्यामुळे चेन्नईच्या खात्यात १४ गुण जमा होतील. मात्र, यापुढचे चेन्नईचे सामने राजस्थान, मुंबई, बेंगलोर, कोलकाता आणि पंजाबसोबत आहेत. त्यात मुंबई आणि बेंगलोरशी असलेला सामना चेन्नईसाठी मोठं आव्हान असेल.
इतर टीम्सची कामगिरीही महत्त्वाची!
दरम्यान, चेन्नईच्या स्वत:च्या कामगिरीसोबतच कोलकाता, हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सची कामगिरीही महत्त्वाची ठरणार आहे. चेन्नईने प्लेऑफमध्ये जाण्यासाठी कोलकाताला पुढच्या ६ मॅचेसमध्ये ४ मॅचमध्ये पराभूत व्हावं लागेल. त्यासोबतच राजस्थान आणि हैदराबादने यापुढच्या सर्व मॅचेसपैकी २ मॅचमध्ये पराभूत व्हावं लागेल.
या स्थितीला दिल्लीच्या टीमकडे १४ गुण असून त्यांची प्लेऑफमधली जागा जवळ जवळ निश्चित झाली आहे. मुंबई देखील १२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे या दोन टीम प्लेऑफमध्ये जाणं निश्चित असून तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी चुरस असेल.