कोणत्याही मोठ्या शहरामध्ये रेल्वे प्रवास हा तिथल्या लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो. मुंबईच्या बाबतीत बोलायचे झाले तर मुंबईकरांना लोकलशिवाय प्रवास शक्यच नाही. परंतु सिग्नल यंत्रणेत बिघाड होणे, ओव्हरहेड वायर तुटणे, ट्रॅकला तडे जाणे यामुळे अनेकदा लोकलसेवा विस्कळीत होते. रेल्वे ट्रॅकला तडे गेल्यानंतर रेल्वे प्रशासनाची आणि रेल्वेच्या कर्मचाऱ्यांची आणि गँगमन्सची तारांबळ उडते. परंतु आता रेल्वेच्या रुळांना जर तडे गेले तर त्याची माहिती त्वरीत रेल्वे प्रशासनाला मिळणार आहे. ही माहिती देण्यासाठी आयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी अनोखा रोबोट तयार केला आहे. या रोबोटमुळे रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालावा लागणार नाही. तसेच प्रवासीही सुरक्षित प्रवास करु शकणार आहेत.
विशिष्ट सेन्सर टेक्नॉलॉजीचा वापर
आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला रोबोट रेल्वे ट्रॅकला जोडण्यात येणार आहे. यामध्ये सेन्सर टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. रोबोट सेन्सरच्या सहाय्याने २ सेंटिमीटरपर्यंतच्या तड्यांची माहिती देऊ शकतो. या रोबोटमुळे गँगमनला दरवेळी ट्रॅकवर उतरुन तडे गेले आहेत की नाही, याची पाहणी करावी लागणार नाही.
कसा असेल हा रोबो?
या रोबोटची उंची १.५ फूट असेल. या रोबोटला पाय नसून चाकं आहेत. रोबोटमध्ये अल्ट्रासॉनिक सेन्सर आहे. हा रोबोट १ मीटर/प्रति सेंकद इतक्या वेगाने धावू शकतो. रोबोटमधील मायक्रोचिपमध्ये रेल्वे रुळांचा डेटा गोळा करता येतो. रुळांची पाहणी केल्यानंतर हा रोबोट जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करुन तडे गेलेल्या ठिकाणाचे लोकेशन रेल्वेला पाठवू शकतो. तसेच गोळा केलेली माहिती साठवून ठेवू शकतो.
गँगमन होतील सुरक्षित
गँगमन नेहमी रेल्वेच्या रुळांची पाहणी करतात. अनेकदा पाहणीदरम्यान गँगमनचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात. पंरतु आता रुळांची पाहणी रोबो करू शकेल. त्यामुळे आता गँगमन सुरक्षित झाले आहेत.