महाराष्ट्रासह मुंबई, ठाणे परिसरात परतीचा पाऊस सुरू आहे. काही भागात शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी एकीकडे चिंतेत आहे तर काही ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान बुधवारी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील शिरोळ ग्रामपंचायत हद्दीतील फणसपाडा परिसरात वीज कोसळल्याने २६ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळतेय. या गंभीर जखमी झालेल्या २६ जणांवर सध्या शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
#UPDATE: 22 more people have been injured in lightning strike incident in rural Thane, taking the total number of injured to 26. #Maharashtra https://t.co/mw1FuMWX7i
— ANI (@ANI) October 22, 2020
जखमीत ६ महिन्याच्या चिमुरडीचा समावेश
बुधवारी संध्याकाळी विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. शहापूर तालुक्यातील शिरोळ ग्रामपंचायत हद्दीतील फणसपाडा येथील थोराड कुटुंबियांच्या घरावर वीज कोसळली. जखमी कुटुंब शेतातील कामे आटपून घरी आल्यानंतर घरात जेवण करत असताना अचानक वीज घरावर कोसळली. यात २५ जण जखमी झाले. या जखमीमध्ये ६ महिन्याच्या एक चिमुरडीचा देखील समावेश आहे. या घटनेत घराची लाकडी खांब तुटल्याने घरचेही मोठे नुकसान झाले आहे. घरातील ८ ते १० जणांना विजेचा जोरदार झटका बसल्याचे समोर आले.
अनेकजणांना विजेचा जोरदार झटका बसल्याने अनेकांचे शरीर सुन्न झाले होते. काही जण बेशुद्ध झाले. ही बाब स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ जखमींना उपचारासाठी प्रथम खर्डी आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. फणसपाडा परिसरातील २६ जणांना या विजेचा जबर झटका बसला आहे. ज्यामध्ये महिला-पुरुषांसह लहान मुलांचाही समावेश आहे.
खर्डी रुग्णालयात ४ तर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात २२ असे एकूण २६ जणांवर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती मिळतेय.