एकीकडे हरवलेल्या मुलाला तब्बल ५ वर्षांनी शोधल्याचा आंनद ठाणे शहर पोलिसांना झाला असता. दुसरीकडे हीच गोड बातमी त्या मुलाच्या पालकांना देण्यासाठी गेलेल्या पोलिसांना ते कुटुंब लॉकडाऊनमध्ये अन्य ठिकाणी स्थलांतरीत झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शोधलेल्या मुलाच्या क्षणभराचा आनंदावर विरजन पडते की काय असे वाटत होते. पण, नियतीच्या मनात काही वेगळेच असल्याने तब्बल पाच वर्षांपूर्वी हरवलेल्या गतिमंद अकबरची आणि कुटुंबाची ठाणे शहर पोलिसांच्या चाईल्ड प्रोटेक्शन युनिटने भेट घडवून आणली. १७ वर्षांचा असताना हरवलेला अकबर आता २२ वर्षांचा झाल्यावर सुखरूप मिळाल्याचा आनंद त्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या चेहर्यावर भेटीच्या वेळी प्रखरपणे दिसून आला.
चाईल्ड प्रोटेक्शन युनिट हे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील बाजारे आणि चाईल्ड प्रोटेक्शन युनिटच्या प्रभारी अधिकारी शीतल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पोलीस आयुक्तालयातील मुलांचा शोध घेत आहेत. त्यातच पाच वर्षांपूर्वी १३ ऑगस्ट २०१५ रोजी नारपोली पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात १७ वर्षीय गतिमंद मुलाचा तपास करताना, त्याचा शोध घेऊन देखील तो मिळून येत नसल्याने ठाणे बालकल्याण समिती कार्यालयामार्फत महाराष्ट्रातील मतिमंद मुलांची संस्थेत पुन्हा माहिती घेत अकबर याचा शोध सुरू झाला. दरम्यान, धुळे येथील शिरपूरच्या अनाथ मतिमंद मुलाची बहुउद्देशीय संस्थेत फोटोद्वारे खात्री करताना बालगृहात अकबरसारखा मिळता-जुळता मुलगा मिळून आल्याने पोलिसांनी तातडीने ती बाब फिर्यादींना देण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर धाव घेतली असता, फिर्यादी हे लॉकडाऊनच्या काळात घर सोडून गावी गेल्याचे समजले.
म्हणून FIR मध्ये दिलेल्या गावाच्या पत्त्यावर संत कबीर नगर पोलीस स्टेशन उत्तर प्रदेश या ठिकाणी चौकशी केली. तर ते तेथेही गेले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यातच पोलिसांनी अखेरचा पर्याय म्हणून ठाणे, कल्याण, मुंबई या भागात उत्तर भारतीय राहत असलेल्या भागात जाऊन त्यांच्याबाबत चौकशी केली तेथेही ते मिळून न आल्याने तेही प्रयत्न पोलिसांचे अयशस्वी ठरले. त्यातच २८ डिसेंबर २०२० रोजी तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांना फोन आला. साहेब ‘मुलगा मिळाला का’ यावेळी पोलिसांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्यावर मुलाचा फोटो पाठवल्यावर फिर्यादी यांनी फोटोतील मुलगा अकबर असल्याचे ओळखले. त्यानंतर पितापुत्राची भेट झाली आणि पोलिसांनी घेतलेल्या मेहनतीचे अखेर चीज झाल्याचे पाहण्यास मिळाले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पाच वर्षे शोध घेऊनही तो मुलगा मिळत नव्हता. जेव्हा त्याच्या चेहर्यासारखा मिळताजुळता मुलगा मिळाल्यावर त्याची माहिती कुटुंबाला देण्यासाठी गेल्यावर ते कुटुंब लॉकडाऊनमुळे तेथून स्थलांतरीत झाल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांचाही शोध घेऊन ते सापडले नाही. दरम्यान, फिर्यादींचा फोन आल्यावर त्यांची खातरजमा करत मुलाची आणि कुटुंबाची भेट घडवून आणली.
– शीतल मदने, प्रभारी अधिकारी, चाईल्ड प्रोटेक्शन युनिट, ठाणे