कर्जामध्ये बुडालेल्या एअर इंडिया कंपनीला पुन्हा एकदा १ हजार कोटी रुपयांचे कर्ज हवे आहे. यावर्षात सलग तीन महिने एअर इंडिया आपल्या ११ हजार कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळे एअर इंडियाने १ हजार कोटींचे अल्प मुदतीचे कर्ज देण्याची विनंती बँकांना केली आहे. बँकांना या कर्जाशी संबंधित प्रस्ताव १३ जून पर्यंत मांडण्याचे सांगितले आहे.
‘अतिरिक्त’ कामांसाठी हवे कर्ज
या कर्जासाठी कंपनीने कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगाराचे कारण न सांगता कंपनीच्या ‘अतिरिक्त’ कामांसाठी कर्ज हवे असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे. एअर इंडियाने ७ सप्टेंबर २०१७ पासून ते जानेवारी २०१८ पर्यंत तब्बल ६ हजार २५० कोटींचे कर्ज घेतले आहे. त्यानंतर आता पुन्हा १ हजार कोटींचे कर्जाची आवश्यकता आहे.
कंपनीचे ७६ टक्के शेअर्स विकण्याचा सरकारचा प्रस्ताव
२०१२ मध्ये युपीए सरकारच्या अर्थमंत्रालयाने कंपनीली बेलआऊट पॅकेजमधील नुकसानीतून २६ हजार कोटी रुपयांचा निधी दिला होता. तरीही एअर इंडिया कंपनी दिवसेंदिवस कर्जामध्ये डुबत चालली आहे. त्यामुळे सरकारने या कंपनीचे ७६ टक्के शेअर्स विकण्याचे ठरवले होते. मात्र शेअर्स खरेदीसाठी कोणतेही उद्योजक पुढे आले नाहीत.
पगार न झाल्यास कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत
एअर इंडिया कंपनीने कर्मचाऱ्यांना मागील तीन महिन्यांपासून वेतन दिलेले नाही. कंपनीच्या प्रवक्तांनी सांगितले होते की, पुढील आठवड्यापर्यंत पगार होईल. परंतु, अद्यापही पगार झालेला नाही. त्यामुळे कर्मचारी संघटनांनी कंपनीला पगार मिळेपर्यंत संप करण्याचा इशारा दिला आहे.