मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या ‘महाराष्ट्रविकास’आघाडीने विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करत १६९ आमदारांनी ठरावाच्या बाजुने मतदान केले. त्यामुळे आज राज्यात अखेर विश्वासदर्शक ठरावाची चाचणी मोठ्या विश्वासाने जिंकल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत आपले पहिले भाषण केले आहे. या भाषणात उद्धव ठाकरेंनी आपल्या सरकारवर विश्वास व्यक्त करणाऱ्या सर्व आमदारांसह जनतेचे देखील आभार मानले आहेत. तसेच जनतेच्या आशिर्वादाशिवाय हे शक्य झाले नसते, असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत.
Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray in assembly: Yes I took oath in name of Chhatrapati Shivaji Maharaj and also in name of my parents. If this is an offence then I will do it again pic.twitter.com/OvfTzKbdeZ
— ANI (@ANI) November 30, 2019
काय म्हणाले मुख्यमंत्री?
‘माझ्यावर मंत्रिमंडळाने आणि सभागृहाने जो विश्वास व्यक्त केला आहे त्यामुळे मी सर्वांचे आभार मानत आहे. त्याचबरोबर मी सर्व जनतेचे देखील आभार मानतो, त्यांच्या आशिर्वादाशिवाय हे शक्य नव्हते. आयुष्यात पहिल्यांदा या सभागृहात आलो आहे. इथे येताना दडपण होते, कारण इथे कसे वागायये हे मला ठाऊक नव्हते’.
मैदानातच चांगले असते
‘मी मैदानातला माणूस आहे. त्यामुळे सभागृहात काय आणि कसे होईल याची मला चिंता होती. पण इथे आल्यावर कळले मैदानातच चांगले असते, अशा शब्दांत सभागृहात भाजपाने घातलेल्या गोंधळावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी टीका केली आहे. मी समोरा-समोर लढणारा आहे शत्रूला अंगावर घेणार आहे’, असेही ते पुढे म्हणाले आहेत.
‘तसेच शपथविधीच्या वेळी मी छत्रपती शिवाजी महाराजांची, माझ्या आई-वडिलांच्या नावाने शपथ घेतली. जर हा गुन्हा असेल तर पुन्हा पुन्हा आणि प्रत्येक जन्मात मी पुन्हा शपथ घेईन. जो आपल्या दैवताला मानत नाही, आई-वडिलांना मानत नाही तो जगायच्या लायकीच नाही’, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजपाने सभागृहात मांडलेल्या आक्षेपाच्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे. तसेच सभागृहाच्या कामकाजाची पद्धत बाजूला ठेवून नको ते विषय इथे माडंले गेले, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
हेही वाचा – ठाकरे सरकारने जिंकला बहुमत प्रस्ताव; १६९ आमदारांचे समर्थन